
गेले कित्येक दिवस पुढचे
पाउल म्हणत म्हणत १०० वर्षापूर्वीचा सासू सून वाद ..पाहून मी मराठी वाहिन्या पाहाव्या
की नको या विचारात पडलो होतो. पण पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीने मला सकारात्मक
विचार करायला भाग पडले.
गेले कित्येक दिवस गाजत
असलेली “उंच माझा झोका” ही मालिका , मालिका न ठेवता त्यातून प्रत्येक घरात
नांदणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करून, त्यातून एक पुरस्कार सोहळा करण्याचा संकल्पना करणाऱ्या झी
मराठी वाहिनीचे अभिनंदन.
मनोरंजन वाहिनी ही सामाजिक
बांधिलकी, जबाबदारी जपणारी सुद्धा असू
शकते याचे हे उत्तम उदाहरण.
सामाजिक बांधिलकी जपणे हे
फक्त सह्याद्री वाहिनी पुरतेच मर्यादित आहे का काय असे मला वाटत होते पण कदाचित या
प्रश्नांचे यथोचित उत्तरच झी मराठी ने या पुरस्काराने दिले आहे.
महाराष्ट्रात विविध
क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रीशक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव
करणे आणि ‘कतरिना’ वादळात फसलेल्या आपल्यासारख्या तरुणायीला, स्त्री प्रत्येक
क्षेत्रात तेवढीच मोठी वादळवाट बनवतेय हे समोर आणायचे स्तुत्य काम या पुरस्काराने
केले असे मला वाटून गेले
पुरस्कार मिळणाऱ्या माधुरीताई
असोत की कब्बडी मध्ये जग जिंकून येणारी दीपिका जोसेफ असो प्रत्येक पुरस्कार
महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिरकणी ला दिला आहे असे मला वाटत होते.
प्रत्येक पुरस्कार मिळताना
आपण या जगात किती छोटे आहोत याची कुठेतरी चुटपूट मला लागत होती.
कार्यक्रमाची बांधणी पुरस्कारांच्या
प्रत्येक हिऱ्याला न्याय देऊन बनवलेली होती . नाहीतर मनोरंजन या नावाखाली आजकाल चित्रपटातील
तांत्रिक पुरस्काराना जशी कात्री मारली जाते , एन्ड क्रेडीट मध्ये चित्रपटात
मेहेनत केलेल्या माणसाना जसे नकळत डावलले जाते तसे कुठेही वाटले नाही. हे सुद्धा
खूप आवडले .
या कार्यक्रमाच्या ब्रेक
मधल्या जाहिराती सुद्धा अतिशय योग्य आणि पुरस्काराला साजेश्या होत्या हे सुद्धा
कौतुकास्पद म्हणावे लागेल.
मग सोसायटी चहाची असो की
dove साबणाची J ..
पण होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या
वेळी गर्दी करणाऱ्या महिला या सुवर्णक्षणी का गर्दी करत नाहीत हे कुठेतरी
कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये असलेल्या तरुण महिलांच्या सहभागावरून वाटून गेले. कदाचित
याच कारणामुळे आपल्या समाजात भवानी शक्ती उपासनेसाठी वर्षातून नउच दिवस का? याचे
उत्तर मिळते .
मनोरंजन वाहिन्यामुळे आपण
गाणे गावे, नाच करावा किंवा अभिनय करावा असे वाटणाऱ्या लहान मुलींना सोबत बसून, प्रत्येक क्षेत्रात काम करून वलय हे
निर्माण करता येऊ शकते असे कुठेतरी या
पुरस्कारातून दाखवून दिले.
गांधी सिनेमा हा जसा प्रत्येक
गांधी जयंती ला आवर्जून पाहिला जातो तसा हा पुरस्कार दर वर्षी तितकाच आदराने
पाहावा आणि प्रत्येकाने त्यातून प्रेरणा घ्यावी हीच या पुरस्कार सोहळ्याची खरी पावती ठरेल...