Showing posts with label समीक्षा. Show all posts
Showing posts with label समीक्षा. Show all posts

Sunday, February 17, 2019

ध्यासपर्वाची विलक्षण अनुभूती -आनंदी गोपाळ



निर्मिती -फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज
दिग्दर्शक- समीर विद्वंस
कलाकार - ललित प्रभाकर ,अंकिता गोस्वामी आणि भाग्यश्री मिलिंद आणि गीतांजली कुलकर्णी
संवाद -इरावती कर्णिक
गीते- वैभव जोशी संगीत -हृषीकेश दातार जसराज जोशी

प्रत्येकाने पहावा व दुसऱ्यांना दाखवावा असा

डॉ आंनदी बाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर असं हुशार मुले ,सामान्य ज्ञान असणारी जिद्यांसू मुले , यांना हे नाव कदाचित परिचित असेलच..

पण एखादं नाव नावारूपाला येण्याआधी त्यामागचा संघर्ष ,तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असून त्यावर केलेली मात आणि ही ज्ञानगंगा चित्रलोकी आणण्याचं काम करणारा भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी  ( आनंदी बाईंचे पती ) या सर्वाचं सिंहावलोकन करून 2 तास 14 मिनिटात त्याचा एक बायोपिक पाहुन जेव्हा नतमस्तक व्हाव वाटतं  ती कलाकृती म्हणजे "आनंदी गोपाळ "
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे असणाऱ्या अगणित माता पत्नी शिक्षक यांची मोठी यादी आपल्याकडे नक्कीच असते पण  150 वर्षांपूर्वी आपण शिकू शकतो हे मनाला शिवत सुद्धा नाही अशा स्त्री ला आपल्या काहीशा जिद्दी हेकेखोर टोकाच्या आणि तऱ्हेवाईक दृष्टीकोन ठेवुन डॉक्टर बनवणारे वल्ली भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी .  या जोडप्याच्या ध्यासाची आणि त्यांच्या प्रवासाची अत्यंत प्रभावशाली गोष्ट म्हणजे चित्रपट ..आंनदी गोपाळ

... चित्रपट म्हणून एक उत्कृष्ट कथा, त्यामागची भूमिका जाणून केलेलं जाणतं दिग्दर्शन ,ते घडताना तोच दृष्टीकोन दाखवणारं  डोळस छायाचित्रण, या छायाचित्रणाला 150 वर्षापूर्वी घेऊन जाणारे अत्यंत प्रभावी असे कला दिग्दर्शन आणि वेशभूषा, या सर्व गोष्टीला साजेसे हृदया व मनाला हलवणारे संवादलेखन व गीतलेखन
व या पंचमहाभूतातून बनलेले व्यक्तिचित्र आणि त्या भूमिका जगणारे ललित प्रभाकर ,भाग्यश्री मिलिंद, गौरी कुलकर्णी
या मुळे अतिशय उत्कृष्ट चित्रनिर्मिती  म्हणजे… आनंदी गोपाळ

उंच माझा झोका सारखी सारखी उत्कृष्ट मालिका सासू सून झंझावात असताना सुद्धा झी मराठीने प्रवाहाविरुद्ध निर्माण केली आणि त्याच सोनं केलं या झी समूहाने या विषयाला भक्कम निर्मिती साथदिली हेंसुद्धा त्यांनी गोपाळराव जोशी यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यासारखं आहे असं मला इथं म्हणावं वाटतं

हा सिनेमा हा फक्त त्या काळाचं दर्शन व जाणीव किंवा डॉ आनंदीबाई जोशी  यांना वंदन करून थांबणारा नक्कीच नाही तर अजूनही प्रत्येक पुरुषाला महिलांना समान संधीच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे हे सांगणारा सुदधा आहे.
अजून सुद्धा आपली संस्कृती “पंचकन्या स्मरे नित्यम” म्हणणारी जरी असली तरी काचेचं छप्पर देऊन तिला रोखणारी सुद्धा तितकीच आहे हे सगळ्या पुरुषांना कळत नकळत माहीत असेलचं..
कदाचित म्हणूनच चित्रपताशेवटी असणाऱ्या काही वेधक छायाचित्रात अजूनही पहिली महाराष्ट्राची मुख्यमंत्री स्त्री नाही हे कुठतरी जाणवून जातेच..
पण हा सिनेमा पाहून आल्यावर उद्या जर आपल्या घरातील स्त्री ची कुठलीही महत्वाची मीटिंग काम असेल तर तिचा डबा जरी घरच्या पुरुषाने भरून दिला तर चित्रपट निर्मितीचा सर्व खर्च कारणी लागला असं निर्मात्यांना  म्हणावं लागेल..

हे सर्व वाचल्यावर आणि आनंदी गोपाळ सिनेमागृहात पाहिल्यावर कदाचित तुमच्या मधला सकारात्मक गोपाळ जागा होईल व तुमच्या जवळच्या आनंदीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना...

जयदीप भोगले
17 फेब्रुवारी 2019

Friday, November 9, 2018

आणि .... सुबोध भावे


चित्रपट:    आणि... काशिनाथ घाणेकर

कलाकार ...सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी आणि बरेच मातब्बर कलाकार


दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे


पाहावा की नाही: 'तुला पाहते रे पाहता का ?? ' मग उत्तर मिळेल..

नावात काय आहे असं बरेच जण सांगतात अनुभवतात पण जेव्हा एखादा बायोपिक तयार होतो त्याच्या नावातच सगळं असतं कुतुहुल, कथा, आठवणी ,परीक्षा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यासाठी दिग्दर्शक ते प्रेक्षक "याजसाठी केला अट्टहास" म्हणत असतात.

बहुचर्चित व दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट,  बऱ्याच जणांच्या लाडक्या असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांची कथा सध्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मध्यमवयीन देखणा  आणि घाऱ्या डोळ्याचा नट सुबोध भावे साकारतो आहे म्हणजे कुतूहल व परीक्षा या दोन्ही गोष्टी  शिगेला असणारच..

यात काशीनाथ घाणेकर यांचा डॉक्टर ते ऍक्टर असा प्रवास.
सिगरेट च्या धुरासारखं उडत जाणारं वलयांकित  आयुष्य.
दारूच्या घोटसारखी  अर्थशात्रच्या इंजिल लॉ ऑफ consumption ला खोटे ठरवणारी अफाट प्रसिद्धी...
व उंच अशा धबधब्याजोगी प्रसिद्धी ते नाराजी असणारी त्यांच्या जगण्याची बेफीक्री या सगळ्याचा मिलाफ म्हणजे आणि डॉ काशीनाथ घाणेकर...

बालगंधर्व ,लोकमान्य आणि काशिनाथ या तीन भूमिका तितक्याच वेगळ्या पद्धतीने साकारणारे सोने म्हणजे सुबोध भावे . बालगंधर्व सम गळ्यातला लक्ष्मी हार असू दे की सोनेरी मानपत्र असलेलं लोकमान्यांचं आयुष्य... आणि हेवा वाटणारं व कधीही हरवेल अस मनगटात असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांचं ब्रेसलेट ...या सगळ्याची घडण सुबोध भावे यांच्या बावनकशी सोन्यातूनच घडलीय आणि एकदम शोभलीय सुद्धा..

स्क्रीनभर पुरून उरणारा सुबोध भावे , दिवाळीच्या फराळाच्या थाळीत असणारा प्रत्येक पदार्थ जसा आवश्यक असतोच आणि एकदम जमून जातो असे सर्व कलाकार व त्यांचे अभिनय  यामुळं सिनेमा मराठी रसिकांना पसंतीस पडेल हे नक्की..

सिनेममधली गाणी थोडासा रटाळ वाटणारा शेवट व फक्त अश्रू आणि संभाजी यावर सुपरस्टार होणारं डॉक्टरांच आयुष्य या गोष्टी खटकणा-या वाटतील सुदधा पण परिपूर्णता म्हणजे पूर्ण विराम .. त्यामुळे कलाकृती उद्गारवाचक , प्रश्नार्थक असणं जास्त चांगलं असं मला नेहमी वाटतं...उसमे क्या है !!!!

डॉ साहेबांनी रंगभूमीला पुष्कळ काही दिलं पण त्यांच्या धुरकट व प्यालाच्या  चष्म्यातून पाहिलेल्या आयुष्यामुळे आम्ही तरुण एका मोठ्या नटाला रंगभूमीवर पाहायला मुकलो याची खंत नक्कीच वाटते.

चित्रपटात एक स्वगत आहे की टाळी ही कलाकाराला सरस्वतीने दिलेला शाप आहे .
पण खरं तर सुधाकरापासून काशीनाथपर्यंत (बाकी सुद्धा बरेच) लोप पावणारे  स्पिरीट चे दिवे पाहिले की कळते की सुरा हाच कलेला न कळलेला  शाप आहे.

अर्ज किया है

ए गालिब तू वली होता
अगर तू बादाखार न होता

सुबोध भावे यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।

जेडी
9 नोव्हेंबर 2018

Friday, June 23, 2017

जुमेरात ची इफ्तारी .... सुखन











दर रमजान मध्ये काही मुंबईकर खास वेळ काढून मोहमद अली रोड ला जातात आणि मालपुआ कबाब यावर मनसोक्त ताव मारतात.काही जण खास दिल्ली आग्रा फतेहपुर सिक्री आणि “शहर ए तहजीब” लखनऊ ला भटकतात या सगळ्या जागी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे मुगल मुगलाई आणि त्या  काळापासून वाढलेली एक मधुर अशी भाषा उर्दू !!!
काही जणांना आजकाल उर्दू म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजाची भाषा आहे असा गैरसमज आहे
तर काहीजण “फ्रेंच माझी सेकंड लँग्वेज आहे” असे म्हणून त्यांना सगळ्या  आपल्या भाषा घरकी मुर्गी आहेत
म्हणूनच का काय ही उर्दू एकदम मोडी जवळ जाऊन बसली आहे . मोडीत काढणे म्हणजे काय याचा अर्थ मला हळू हळू समजू लागलाय
१९७० १९८० मध्ये उर्दू आपल्या काही सिनेमातून जिवंत राहिली . साहिर साहेब व मजरूह साहेब यांनी तिला थोडे गुणगुणत ठेवले. १९८० नंतर जगजीत सिंग व पंकज उधास यांनी गजल मधून ही आम करून दिवाने खास मध्ये तरी खिळवून ठेवली. पण आता उर्दू आजकालच्या ओढून ताणून बनवलेल्या संवादात धडपडत असते . इर्शाद व मुकर्रर याचे “ शॉर्ट फॉर्म” नसल्यामुळे whatsaap मधून सुद्धा तिची हकालपट्टी होते
या अशा इतक्या मधूर व खुसरो ने “ अमीर “ केलेल्या उर्दू ला वाचवायला “ सेव्ह टायगर “ असा उपक्रम  सुद्धा करता येत नाही त्यामुळे संस्कृत मोडी उर्दू या ... आपल्या पूर्वजांच्या फोटो प्रमाणे धूळ खात पडतात. आपण वर्षामधून त्यांचे पितारांसारखे दिवस सुद्धा घालतो म्हणा !!!


तर अशी ही उर्दू एखादि  मराठमोळी  मंडळी आपल्या समोर आणतात असा म्हणालो तर तुम्ही मला कदाचित वेड्यात काढू शकाल पण या अशा औलिया लोकांचा लौकिक प्रयत्न म्हणजे “ सुखन”
हा काल मी ठाण्यात गडकरी रंगायतन ला पाहिला . बुक माय शो मधून परीक्षण वाचून गेलो होतो तरीही तिथला अनुभव म्हणजे पावसाची कविता वाचणे आणि पावसात भिजणे यात काय फरक असतो  इतका सुंदर व जिवंत होता
सुखन मधले प्रत्येक कलाकार अगदी (सारंगी व हार्मोनियम सहित)  म्हणजे  गजल बनवण्यासाठी लागणाऱ्या शायरी मध्ये जसे  रदीफ काफिया वजन असं काहीतरी लागतं म्हणतात व त्याच्या हव्या तितक्या प्रमाणात असण्यानेच एक आविष्कार घडतो तसे आहेत .
 मग मखमली आवाजाची अवंती पटेल असो कि सुफी अंदाज असणारा जयदीप वैद्य.प्रत्येक कलाकार आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. या कार्यक्रमाचे दोन कलाकार म्हणजे शरीर आणि आत्मा असल्यागत आहेत ते म्हणजे ओम भूतकर आणि नचिकेत . पुणेरी श्रीखंड खाऊन इतक्या उच्च प्रतीची उर्दू कोणी बोलू शकतो  याची देही याची डोळा प्रचीती घायची असेल तर ही कलानिर्मिती पाहणे एकदम Must!! आहे
जसं गर्द हिरवळीची मजा घेत  आपल्या धुंदीत जगण्यासाठी स्वतः वनस्पत्तीशास्त्रज्ञ असण्याची गरज नसते तसच “सुखन” पाहताना उर्दू यावीच अशी नक्कीच अट नाही व गरज तर नक्कीच नाही
इरूवर सिनेमामध्ये मला ऐश्वर्या राय ची तमिळ “ न समजता” जितकी गोड वाटली तितकीच प्रत्येक गजल व कव्वाली (उर्दू फार जास्त  न समजता ) मला तितकीच हविहवीशी वाटली.
हे या कार्यक्रमाचे परीक्षण म्हणून मी नक्कीच लिहिलेले नाही .  काही लोक या जगात किती चाकोरीबाहेर जाऊ शकतात  त्यांना किमान पहावं ,त्यांचे कौतुक करावं व त्यातून एक निखळ आनंद मिळवावा, व जमलं तर त्यांच्यासारखं आपणही कधी वेडे व्हावं  म्हणून लिहिलं आहे
उर्दू म्हंटल कि गालिब, मीर, मोमीन इतकच काही जणांना आठवत पण यांच्या खजिन्यात अशी असंख्य रत्न आहेत  तर आज म्हणे ते दिनानाथ मंगेशकर पार्ल्यात सुखन घेऊन येतायत ... तर तुम्ही अवश्य जा खुल जा सिमसीम म्हणा !!! आणि जमल नाहीच तर हे सुखनवर मुंबई व पुण्यात असेच येत राहो अशी सदिच्छा तर नक्कीच असू देत
है और भी दुनिया मे सुखनवर बहुत अच्छे
कहते है के “ ओम भूतकर” का अंदाजे बयान और

जयदीप भोगले

Thursday, January 6, 2011

रसिकेंद्रासाठी आणि टी वी विश्वमित्रांसाठी आलेल्या अप्सरा ...






वाहिनी - झी मराठी
कार्यक्रम- एका पेक्षा एक - अप्सरा आली
वेळ- बुध गुरु - ९.३० रात्रौ
पाहावा की नाही - अवश्य



 नृत्य हा सर्वांनाच आवडीचा असा कलाप्रकार आणि त्या वर आधारित अनेक कार्यक्रमांचे आलेले पीक आपणाला परिचित आहेच . प्रत्येक वाहिनी हिंदी मराठी अगदी मल्याळी सुद्धा लावावी आणि आपल्याला कुठेना कुठे तरी झलक मिळेलच .. आता हे सादरीकरण किती भडक, किती तालबद्ध, आणि करणारी व्यक्ती यावर अवलंबून असते आणि आपला रिमोट याच्या दर्जावर आपले काम करत असतो म्हणजे काम आपण करतो तो तसे वागतो ..
झी मराठी वाहिनीने अतिशय उत्तम नृत्य दाखवून एका पेक्षा एक ( नावाला सार्थ ) असा कार्यक्रम गेले चार पर्व लोकांपर्यत आणला .. लोकांना कदाचित भार्गवी , आणि अमृता अजूनही आठवत असतील ..
आता आपल्याला या आठवत असतील तर आपल्या आठवणी पुसून टाकायला आणि त्यावर अजून हळुवार अशा अनुभवांची ( फक्त दर्शनीय ) अनुभूती करून द्यायला नऊ अप्सरा येत आहेत ..
त्या एक आठवड्यापूर्वीच आपल्यासमोर आल्या म्हणा पण काही विश्वामित्र जर इतर वाहिन्या बघण्यात गुंग असतील तर माझी प्रतिक्रिया त्यांच्या क्रीयाशिलातेसाठी कदाचित फायद्याची होईल .
एका पेक्षा एक- अप्सरा आली असे नाव घेऊन आलेल्या या तारकांच्या नृत्यास्पर्धेला पहिल्याच भागात प्रतिसाद मिळेल अशी खात्री झाली. 
फुलवा खामकर,मयूर वैद्य आणि दीपाली विचारे या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आपल्या कौशल्याचे आणि अनुभवाचे धडे या ललनांना देणार आहेत .. त्यामुळे सुंदर दिसणारी अप्सरा थिरकताना अजून किती खुलते हे काही वेगळे सांगायला नको .
आता या अप्सरा आहेत तरी कोण ? नेहा  पेंडसे  , गिरीजा  ओंक , मृण्मयी   देशपांडे , उर्मिला  कानेटकर , नेहा  जोशी , स्मिता  तांबे , आरती  सोलंकी  आणि   सोनाली  खरे  या अष्टललनासमवेत एक वादळ येत आहे ...एक सौंदर्याचा झंझावात येत आहे आणि तो म्हणजे नटरंगी नार ... सुरेखा पुणेकर ...

आता या नऊ ललना नौरासंपैकी आवडता आणि रसरशीत असा शृंगार रसाने नटलेला असा कार्यक्रम सादर करणार असतील तर लोकांच्या उड्या पडणार नाही तर नवलच ...

पण आता आपण बाकी गोष्टी जरी पहिल्या तर या सर्व ब-यापैकी चांगल्या नृत्य करणा-या आहेत, उत्तम दिसण-या आहेत आणि झी मराठी मालिकांच्या एक एक रत्न आहेत  ..

मध्यमवर्गीय भीती आणि अपुरे धाडस म्हणून कित्येक दिवस पुण्यात येऊन सुद्धा मी नटरंगी नार पहिला नव्हता .. पण सुरेखा पुणेकर यांना जेव्हा या शो मध्ये पहिले तर दिलखेचक म्हणजे काय  ..नयनबाण म्हणजे कसा असतो याचा  प्रत्यय मला आला .. आणि यावर दिपाली यांनी विचारलेला प्रश्न -- ' सुरेखाताई ( त्यांच्या)  आपण जेव्हा नाचता ,तेव्हा प्रत्यक व्यक्तीला आपण त्याला इशारा करता आहात, त्याच्या डोळ्यात पाहता आहात असे का वाटते ?' कदाचित इतकी उच्च प्रश्नार्थी दाद कदाचित कुणाला मिळते किवा कोणी दिली असेल ..

सचिन ये नेहमीप्रमाणे या कार्याक्रमचे प्रमुख आणि महागुरू आहेत . त्यांनी पाहिलेली चित्रपट सृष्टी त्यांचा अभ्यास, त्यांची शायरी हे सर्वच या नृत्यांगनाना एक मोलाचे मार्गदर्शन ठरत असले पाहिजे ..

आणि माझा आवडता एकदम कोकणस्थ टोमणे देणारा ( याला कुणीही जातीयवाद म्हणू नये ) पुष्कर श्रोत्री याचे सूत्रसंचालन करतो आहे .. त्यामुळे तबला पेटी आणि घुंगरू असे त्रिकुट असते तसेच 
नऊ नवतरुण आणि सुरेखा पुणेकर यांसारख्या चिरतरुण नृत्यांगना , यांचा ताल सांभाळणारे तीन दिग्दर्शक , पुष्कर श्रोती यांची चपखल सांगत ज्यावेळी झी मराठी सारख्या रंगमंचावर येत असेल तर सोने झाल्याशिवाय राहत नाही.

रसिकहो , म्हणूनच सांगतो , आपण त्याच त्याच बातम्या बघून कंटाळला असाल , एक धड मालिका नाही.. म्हणून चरफडत असाल , मुलांच्या कोडकौतुकाला विटला असाल तर काही अस्सल असे मनोरंजन घेऊन इंद्रपुरीतून नाही तर किमान मुंबपुरीतून आपल्यासाठी एका पेक्षा एक अप्सरा आल्या आहेत १०-१२  आठवडे येत राहतील .. पाहायला विसरू नका
दाद द्यायला विसरू नका

चक्षु चाणाक्ष 
जयदीप भोगले  

Friday, October 15, 2010

करमणुकीची सरबत्ती --- कौन बनेगा करोडपती


 कार्यक्रम- कौन बनेगा करोडपती 
वेळ- ९.००-१०.००
वाहिनी- सोनी 
पहावा की नाही - अवश्य पहा ..
स्टार वाहिनीवर सुरवात करून स्टार आणि अमिताभ या दोघांनाही लोकप्रियतेच्या उच्चांकाला नेणारा  सर्वांचा लाडका प्रश्नोतरांचा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती याने सोनी या वाहिनीवर  या सोमवारपासून नवीन सुरवात नाही तर शुभारंभ केला ( कॅडबरी चोकलेट हे याचे प्रस्तुतकर्ता आहेत .)
चुरशीच्या लढाईमुळे हाच कार्यक्रम शाहरुख खान याने काही काळ सुत्रसंचालीत केला होता .. बादशाह आणि बिग बी यांची चढाओढ कितीही रंजित केली तरी यावेळी मात्र आपल्या हिंदुस्तांनाच्या नव्हे तर प्रत्येक भारतीय मनावर राज्य करणाऱ्या श्री अमिताभ बच्चन यांनी सूत्र पुन्हा आपल्या हाती घेतली ..
यातच आता ही चुरशीचे पारडे कुणाकडे झुकले हे काही वेगळे नमूद करावे असे मला वाटत नाही. असो मोठ्यांच्या वादात आपलं विषयांतर नको .
सोनी वाहिनीवर जरी हा प्रोग्राम नव्याने  सुरु झाला तरी यात काही लाइफ लाईन  सोडल्या तर फार बदल नाहीत ..
पण अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा भेट हेच प्रमुख आकर्षण आहे. 
आता लोकांनी कितीही सांगितले कि आता तो तोच तोच पणा वाटतो .. आता ती एनर्जी नाही .. अजून पुष्कळ कार्यक्रम पाहण्यासारखे आहेत. पण बच्चनची मजा काही वेगळीच
पहिल्याच भागात त्यांनी अग्निपथ आणि दिवार याचा संवाद सादर केला आणि जिंकले .. कदाचितच  इतकी इंटेन्स डिलेव्हरी कुणी दुसरे करू शकते .
अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने आपल्या समोर बसलेल्या जन सामान्याला वागवतात, त्याचाशी संवाद साधतात , त्याचा आनंदाशी कुठेही वरचढ न होता एकरूप होतात हे वाखाणण्यासारखे आहे आणि हे या खेळाचे वैशिष्ट्य .. आणि कदाचित प्रश्नापेक्षा मला हेच पाहायला जास्त आवडते .
या वेळी एक्स्पर्ट पाहुणा एक नवीन भाग आहे आणि ते सुद्धा चपखलपणे बसवले आहे .
प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येक जिंकलेल्या रकमेत आपल्याला उत्तर माहिती असेल तर आपणही जिंकू शकलो असतो ही हुरहूर प्रत्येक दर्शक करत असावा ..
शिवाय मी याबद्दलच्या चर्चा  जुन्या करोडपति  मध्ये तर रस्त्यावर, पानाच्या गादीवर, किराणा दुकानावर सुद्धा ऐकल्या आहेत ..त्यामुळे कोण स्पर्धक किती छान दिसतो पासून कोण किती बावळट ,निर्बुद्ध, ढ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आपण कितीही सुमार बुधिमत्तेचे असलो तरी आपण मस्त ठोकून देऊ शकतो कारण आपल्याला उत्तर काय.. हे माहिती होते,
 अणि ही याची गम्मत आहे .
या कार्यक्रमाने स्लम डॉग ला सुद्धा मदतीचा हात दिला आणि त्या सिनेमात सुद्धा करोडपती हा महत्वाचा भाग होता.
याच कार्यक्रमाने कितीतरी क़्विज शो , विडम्ब्ने आणली .. प्रत्येक कॉमेडी कार्यक्रमात बच्चनची नक्कल केली जाऊ लागली 
कदाचितच इतकी लोकप्रियता आणि त्यावर भाजून घेतलेल्या पोळ्या दुस-या कुठल्या कार्यक्रमात झाल्या असतील असे मला वाटत नाही  ...
आणि सोनी वाहिनीसाठी प्रतिस्पर्धी बिग बॉस हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे  सोनी ला टी आर पी साठी फायदाच होईल नव्हे एव्हाना झाला असेल 
पण दूसरा हुशार मुलगा अजारी पडला म्हणून मी पहिला आलो असा कार्यक्रम करोडपति नक्कीच नाही .. आणि इतर चांगले काही नाही म्हणून बच्चन ला बघू असे दिवस किंवा दर्जा बच्चन साहेब कधीही येऊ देणार नाहीत ..
म्हणुनच सांगतो बच्चनच्या चाहत्यानी , मला लॉटरी लागली तर असे स्वप्न रंगवणा-या स्वप्नाळू दर्शकांनी ..,बरबटलेल्या कार्यक्रमातून आपल्या मुलाला कसे वाचवावे या विचारात असणा-या पालकांनी , आणि आमच्यासारख्या चूक की बरोबर ,चांगले की वाईट अशी उठाठेव करणार-या समीक्षकांनी कौन बनेगा करोडपती अवश्य पाहावा
नाराजी होणार नाही एवढी खात्री .. बाकी आपण सुज्ञ आहात ..
तो चलिये आप और हम देखते है दुनिया का अदभूत खेल ,, जिसका नाम है  -- कौन बनेगा करोडपती ....
 
जयदीप  भोगले
१५ .१० .  २०१० 

Friday, September 10, 2010

सल्लू मियाचा रमजानी शिरखुर्मा - दबंग



चित्रपट- दबंग 
भाषा- हिंदी
कलाकार- सलमान खान , नवतारका - सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान , सोनू सूद, आयटम बॉम्ब- मलायका अरोरा
दिग्दर्शक - अभिनव कश्यप 
संगीतकार- साजिद वाजीद 
पाहवा की नाही - पाहिल्यास मजा येईल
मित्रानो , डोक्याला त्रास देणारे , डोके धरून बघावे लागणारे , आणि डोके बाहेर ठेऊन जाऊन बघायचे अशी मी नवीन वर्गवारी केली आहे. आजच प्रदर्शित झालेला दबंग हा चित्रपट डोके बाहेर ठेऊन जायच्या पठडीतला चित्रपट आहे .
हा एक हाणामारी चित्रपट या धाटणीचा आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी हा चित्रपट शिट्या वाजवणारे , मजा करणारे तरुण , आणि सलमान खान चे पंखे यांना विचारात ठेऊन सर्वेषाम दर्शकांसाठी बनवलेला दिसतो आणि तो प्रयत्न अगदी चोख या चित्रपटात यांनी बजावला आहे.
चित्रपटात कथानक हे फार महत्वाचे ( आजकाल कुठे असते म्हणा) नसल्यामुळे चित्रपट कथावस्तू अशी आहे आणि तशी आहे असे मी सांगणार नाही .
पण तरीही आता हे परीक्षण लिहायचा घाट घातला आहे तर सांगतो, रॉबिनहूड चुलबुल पांडे ( सलमान खान) हा लहानपासुनच त्याचा सावत्र भावाबद्दल( अरबाज खान ) खार खाऊन असतो कारण त्याचे सावत्र वडील प्रजापती पांडे ( विनोद खन्ना) याला कधीच मायेचा हात देत नाहीत .. पण त्याची आई ( डिम्पल कपाडिया ) त्याला समजावून पुढे रेटत असते पुढे हाच मुलगा पोलीस अधिकारी बनतो .. त्याचे उत्तर प्रदेश राजकारणातील गुंडांबरोबर भांडण , एका कुंभार बालेशी  ( अतिशय नीटनेटकी आणि माती न लागलेली ) गुळ घालणे आणि ... बस्स  बस्स ...मला वाटते आता तुम्हाला कथा कशी असेल हे पुसटसे उमजले असेल.
 पण आता अशा कथानकात जर सलमान खानची स्टायील, वेगवान अशी साहस दृश्ये , श्रवणीय गाणी , भन्नाट टाळ्या वाजवायसारखे संवाद जर एखाद्या मसाल्यासारखे घातले तर हेच कथानकाचे सुरण कसे सुरण कबाब बनते हे बघणे मजेदार आहे.
आपल्या ( म्हणजे अरबाझच्या- अशी म्हणायची पद्धत आहे  ) मलायका अरोरा - ' मुन्नी बदनाम हुई - मै झंडूबाम हुई ' आयटम साँग घेऊन थेटर कसे  डोक्यावर घेता येईल याची काळजी घेतात
 तेरे मस्त मस्त दो नैन, हून दबंग  ही गाणी सुद्धा अगदी श्रवणीय आहेत
सोनू सूद या नव्या चेहऱ्याने आपली डावी भूमिका चोख बजावली आहे . बाकी सर्व ठीक .. आता मी बाकीच्या लोकांबद्दल जास्त सांगितले तर भाजिपेक्षा कढईचे कौतुक केल्यासारखे होईल . 
चित्रपटाची जाहिरात बऱ्याच दिवसापासून सर्वत्र धडाक्यात चालू होती आणि वोन्तेड चित्रपट हिट झाल्यापासून सलमानबद्दल प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा आज जवळ जवळ सल्लू भाईनी  पूर्ण केल्या आहेत.
 'वान्तेद' इतकी जास्त रक्तरंजित दृश्ये नसल्यामुळे हा चित्रपट सुखावह वाटतो. शिवाय सवंग प्रसिद्धी साठी अश्लील दृश्ये बरबटलेले संवाद असे यात काही सापडणार नाही त्यामुळे आपण कुटुंबाबरोबर बिनधास्त हा चित्रपट बघू शकतात.सलमान खान हां यामध्ये  अत्यंत लक्षवेधी भूमिका साकार करतो अणि कदाचित हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील एक चांगला चित्रपट म्हणावा लागेल .
.चित्रपट हा मनोरंजन करण्यासाठी असावा त्यातून आपला तीन तास टाईमपास व्हावा ,अशी माफक अपेक्षा असणा-या प्रेक्षकांना हा चित्रपट पर्वणी आहे आणि तो नक्कीच सुखावून जाईल. रमजान च्या या लॉन्ग वीकेंड साथी दबंग हा शीर्खुर्म्या सारखा मेजवानी ठरेल हे मात्र नक्की 
बाकी आपण प्रत्यक्ष पाहून ठरवावे ...

जयदीप भोगले 
 
 
   
 
 

Thursday, September 9, 2010

कोण होतास तू ...काय झालास तू.. बातमी छापण्या विसरून गेलास तू

गेले दोन दिवस मी लोकसत्ताचा मुंबई  अंक पाहतो आहे . आणि मला आश्चर्य वाटले ते त्याचे मुखपृष्ठ पाहून ...

पहिल्या पानावर फक्त जाहिराती ... महाराष्ट्रातील बातम्यांना , ज्वलंत विषयांना आता उघड करण्याची गरज उरली नाही कि अचानक सगळे ज्वलंत प्रश्न थंड झाले त्यामुळे आपल्याला  छापावे असे वाटत नाही.
मी एक मार्केटिंग चा कार्यकर्ता असल्यामुळे जाहिरातीबद्दल मला तितकीच आस्था आहे . कदाचित त्या मिळाल्याशिवाय माध्यमांना चालवणे त्यांना जास्तीत जास्त चांगले बनवणे हे कठीण आहे याची मला संपूर्ण कल्पना आहे. पण हे म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले ... अशी गत झाली .
लोकसत्ता या बद्दल मला विशेष आदर आहे . कदाचित या प्रकारामुळे माझा आदर कमी झाला नाही पण हे त्यानी  केले याबद्दल खेद जरूर वाटतो
या घटनेचा विचार मला संपादकीय आणि जाहिरातदार या दोन बाजूनी करावा वाटतो . संपादकीय बाजूने तर मुखपृष्टावर प्रमुख बातमी सोडून जाहिरात असणे म्हणजे वृत्तपत्रीय संस्थेबद्दल अनास्था दाखवाण्याजोगे वाटते. आणि जाहिरातदारांना आज जरी वाटत असेल कि अशा पद्धतीने त्यांची प्रसाधने, नाव हे लोकांच्या लक्षात येईल तर कुठेतरी गल्लत होईल . कारण जाहिरात ही  योग्य त्या संपादकीय वातावरणात छापल्यास ती नकळत वाचली जाण्याचा जास्त संभाव असतो . जर तुम्ही पहिल्या पानावर जाहिराती त्याही  ४ ते ५ जाहिरातदारांच्या .. तर एक ना धड असे मानून वाचक तडक दुसरे पान उलटत असेल.
शिवाय मी असे ऐकले आहे की जाहिरातदार पहिल्या पानावर जाहिरात देण्यासाठी आगाऊ रक्कम मोजतात आता जर सर्वच जाहिराती असतील तर त्यांनी ज्यादा रक्कम देणे सयुक्तिक वाटत नाही.आता कदाचित गणपती जवळ असल्यामुळे कदाचित त्यांना हा निर्णय घ्यावा लागत असेल पण सण संपल्यानंतर जाहिरातदार, भटाला दिली ओसरी ... असे ही वागू शकतात आणि तसे न वागल्यास त्यांच्या नंतर छापल्या जाणार-या जाहिराती वाचक दुर्लक्षित करू शकतात कारण पहिल्या पानावर थांबण्याची त्यांना सवयच राहणार नाही .
लोकसत्तामधील संपादकीय गुणवत्ता, त्यातील बातम्या देण्याचा दृष्टीकोन , भाषा या बद्दल मला कुठलाही रोष नाही कारण मला तो आजही तितकाच आवडतो चतुरंग ही पुरवणी आणि संपादकीय पान हे तर न चुकावण्यासारखे असते. पण आपल्या श्रद्धास्थानाबद्दल काही न पटणारी घटना घडली तर वाईट वाटते आणि यातूनच अशा प्रतिक्रिया निर्माण होतात. बातमी वाहिन्यांवर चालणारी बंडाळी आपण जाणतोच त्यामुळे वृत्तपत्र माध्यमांनी कुठेतरी संहिता बाळगावी नाहीतर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी वाचकांची अवस्था होईल  
आपल्याला  असा अनुभव आला आहे का कधी? असल्यास जरूर कळवा ... कळावे
 


Monday, August 30, 2010

असेच... नेहमी ..आयुष्यावर बघू ( बोलू) काही .


कार्यक्रम- आयुष्यावर बोलू काही
 दिनांक रविवार २९ ऑग २०१०- 
वाहिनी -   झी  मराठीवर झाला, ( होत असतो )
                बाजारात सी डी उपलब्ध आहे
 सलील आणि संदीप यांची बहारदार मैफल 
कालच संध्याकाळी झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी हा कार्यक्रम पुन:प्रक्षेपित करण्यात आला आणि या कार्यक्रमाबद्दल कुठेतरी लिहावे असे वाटले म्हणून हा  छोटासा प्रयत्न ..
आजकाल अभिरुचीसंपन्न साहित्य, कविता ,गाणी हवी असतील तर आपल्याला जुन्या लेखकांच्या दुनियेत जावे लागते किंवा जुन्या ध्वनिमुद्रित गीतांकडे वाट वळवावी लागते असे जर आपणास वाटत असेल, तर कदाचित ही समीक्षा आपल्याला काहीसे आपले मत बदलायला लावेल पण वेगळ्या पण तितक्याच अभिरुचीच्या जगात जायची वाट दाखवेल.
डॉ सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी सुरु केलेल्या " आयुष्यावर बोलू काही " या कार्यक्रमाबद्दल जर सांगयचे झाले तर हा एक अभिरुचीसंपन्न आणि दर्जेदार मैफिल आहे जी काही काळ आपल्याला जगण्याच्या सर्व क्षणांची अलवार अशी आठवण करून देते.त्यावर प्रेम करायला शिकवते.
झी मराठीने ५०० वा विशेष भाग विशेष निर्मित करून गेल्या वर्षी आपल्या समोर सादर केला. आणि अगदी २ वेळा थेट कार्यक्रम बघणा-या लोकांनीही तितक्याच आवडीने  हा कार्यक्रम पहिला .
विशेष म्हणजे सलील आणि संदीप यांच्या जोडगोळीबरोबर बेला शेंडे यांची गीते , सुनील बर्वे यांचे निवेदन यामुळे या कार्यक्रमाची लज्जत आणखीनच वाढली.
शिवाय काही मातब्बर मंडळी , सोनाली कुलकर्णी मधुरा वेलणकर यांसारखी नयन सुखवर्धक उपस्थिती कानाबरोबर डोळ्यानाही सुखावण्याची काळजी घेत होती हे ही इथे सांगावेसे वाटते . 
हा कार्यक्रम एखाद्या निरस माणसाला सुद्धा कवितेबादल प्रेम नाही तर आदर तर  नक्कीच निर्माण करत असावा.
तसा आयुष्यावर बोलू काही नवीन असतानाच पुण्यात मी एका छोट्या सभागृहात पाहिला होता. " मी मोर्चा नेला नाही" नामंजूर , लव लेटर , या सारख्या कवितांना मिळणारा तरुणाईचा ( माझा सुद्धा-- कारण मी सुद्धा तरुणच आहे ) प्रतिसाद पाहून कुठेतरी कळून गेले की यांची फ्यान मंडळी हि बरेच आहेत.आणि ही वाढतच जाणार आहेत 
 हा कार्यक्रम नुसताच तरुण लोकांचा तरुण लोकांसाठी  आहे असे नाही , सलील आणि संदीप यांनी हा कार्यक्रम त्यांच्या नवीन अल्बम आणि चित्रपट गीतांनी नित्य नूतन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ढीपरी  ढिपांग, अग्गोबाई ढग्गोबाई , निशाणी डावा अंगठा या मधल्या काही वेगळ्या पण श्रवणीय अशा गीतांनी अबालवृद्धाना आवडणारा बनतो आहे.
या कार्यक्रमात गायलेले "बाबांची कहाणी" बघितल्यावर भावपूर्ण गीतांना भाडोत्री अश्रूंची गरज नसते हे कुठेतरी जाणवून जाते. आणि कदाचित टी वी वाहिन्यांसाठी ही पर्वणी आणि आश्चर्याची बाब असे दोनीही ठरली असावी
. हा कार्यक्रम म्हणजे मला माझ्या पुण्यातल्या होस्टेल जीवनासारखा पुढे जातो असे वाटते.. सकाळी उठावे बेडेकर मिसळ खावी मग, बादशाही मध्ये जेवण नंतर फुलचंद पान ,संध्याकाळी हिंदुस्तान बेकरीची प्याटीस, आणि रात्री प्रभातचा सिनेमा किंवा बालगंधर्वला नाटक अगदी पुणेरी आणि साधा वाटला तरी अस्सल मराठमोळा आणि लज्जतदार अनुभव ... अगदी तसाच अनुभव या कार्यक्रमात येतो .
 आता मी इतर कार्याक्रमंवर टीका म्हणून नाही पण सांगतो प्रत्येक कार्यक्रमला आपला एक बाज असतो आणि तो तसाच पुढे जातो आणि संपतो. पण वैविध्य टिकवणे आणि सर्वाना ते आवडणे हे खूप अवघड असते
 आणि " आयुष्यावर बोलू काही" मध्ये चपखलपणे हे सलील आणि संदीप साधून जातात. 
आता या कार्याक्रमची सी डी बाजारात आली आहे पण तरीही मला सांगवेसे वाटते एखादी संध्याकाळ, अगदी दिवसही चालेल पण आयुष्यावर बोलू काही आपल्या शहरात आल्यास चुकवू नये .
प्रेमभंग असो की प्रेमात रंग असो , तरुण असो की म्हातारा , मित्रांची टोळी असो की मैत्रिणीची टाळी, हा कार्यक्रम कुणाबरोबर ही बघता येईल त्याचा आनंद लुटता येईल.  या कार्यक्रमाबद्दल मला वेगळेसे सांगावे लागणार नाही पण इतर शहरात, भारताबाहेर आपल्याला हा कार्यक्रम माहित नसेल तर हा अवश्य पाहावा .. 
म्हणूनच म्हणतो जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही .. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही...
जयदीप भोगले
३० -०८-२०१० 
 
 


Thursday, August 19, 2010

हवी हवीशी वाटणारी ... (ग्रेट) भेट



कार्यक्रम  - ग्रेट भेट
वाहिनी - आय  बी  एन  लोकमत 
वेळ   - शनिवार  ९ .३०  रात्रौ, रविवार दुपारी १२   

मित्रहो आपण कदाचित माझे लेख वाचत असलाच पण एक नवोदित ब्लॉगर   म्हणून मला आपल्या प्रतिक्रियांची  ही अपेक्षा आहे . जेणेकरून मी माझे  लेख दिवसेंदिवस सुधारू शकेन, प्रयत्न नक्कीच करेन . शेवट निर्णय आपला आहे .

आय बी एन वाहिनीवर  प्रक्षेपित  होणारा   ग्रेट  भेट  या   कार्यक्रम तसा सुरु होऊन बरेच दिवस झाले पण गेले काही रविवार मी नियमित बघत असतो.नियमीतपणा हा सवयीमुळे किवा आवडीमुळे निर्माण होतो असे म्हणतात
यात आपल्याला ज्यांच्याबद्दल जाणून घ्यावे वाटते , ज्यांनी आपल्या क्षेत्रात विशेष उंची गाठली आहे अशा काही दिग्गज सेलेब्रिटीबरोबर निखील वागळे दिलखुलास बातचीत करतात. मी ते त्यांची मुलाखत घेतात असे म्हणणार नाही कारण मुलाखती इतकी औपचारिकता न आणता पण समोरच्या व्यक्तीच्या आदराच्या स्थानाला धक्का न पोहचवता ते एक एक पान उलटत जातात असे वाटते. भेट मग राजकारणासारख्या रुक्ष भासण-या क्षेत्रातील दिग्गजांची असो की नाट्यक्षेत्रात , चित्रपट क्षेत्रासारख्या चंदेरी दुनियेतील असो ती तितक्याच सहजतेने आणि कलात्मक पद्धतीने पुढे जाते ही  या कार्याक्रमची खासियत वाटते.
गप्पा  होताना निखील वागळे कुठेही त्या व्यक्तिमत्वाच्या आड येतात असे वाटत नाही . हिंदी वाहिनींवर बर-याच वेळा मला असे प्रकर्षाने जाणवते की मुलाखातकाराची उंची आणि स्तर वाढवा आणि त्याच्या कौशल्याचे कुठे तरी मूल्यमापन व्हावे म्हणूनच की काय उत्तुंग व्यक्तींना बोलावण्यात येते आणि ह्यांची सिधी बात कधी वाकड्या वळणावर जाते ते कळतच नाही बहुदा ती सरळ रस्ता गाठतच नाही.
कार्यक्रम अगदीच व्यावसाईक नसल्यामुळे  घाईत लोकल पकडल्यासारखे ब्रेक घेण्याची इथे पद्धत नाही. आणि निखील वागळे आजचा सवाल यात घणाघाती शब्द घाव घालत असले तरी इथे कुठेतरी परिपक्व होऊन आपण कदाचित भेटीला येणा-या व्यक्तीचे स्वगत ऐकत आहोत इतक्या मुक्तपणे कार्यक्रम पुढे नेतात. 

कार्यक्रमातील व्यक्तींची निवड अगदी त्या चपखलपणे केलेली असते. मी निवडणुका असतना मा. शरद पवार, मा. राजसाहेब  ठाकरे. आणि इतर सर्व पक्षांच्या प्रमुख व्यक्तींची भेट बघितली आणि ती माणसे  वेगळ्या पक्षाची आहेत   एवढीच वेगळी वाटली त्यांची कामाची जिद्द , त्यांचा दृष्टीकोन हा सर्व कुठेतरी दिसून आला. त्यांची उंची  आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ आहे असे कुठेतरी वाटुन गेले   . खरेतर निवडणुकींच्या काळात अशा पद्धतीने मुलाखत घेणे मला अवघड वाटते. (मी मुलाखत घेणारा नसलो  तरीही )  
डॉक्टर लागूंची मुलाखत , शोभा दे यांची मुलाखत या मला विशेष आवडल्या कदाचित मला त्या क्षेत्राबद्दल आवड आहे किवा कुतूहल आहे म्हणून सुद्धा असेल .पण बाकी ग्रेट भेटी सुद्धा मला तितक्याच भावून गेल्या.,  कुठेतरी हव्या हव्याशा वाटून गेल्या .
मूल्यमापनच करायचे झाले  तर ई टी वी वरचा संवाद हा एकाच कार्यक्रम कदाचित याच्या स्पर्धेत टिकू शकेल किंवा कदाचित थोडा वरचढ ठरेल असे मला सांगावे वाटते .पण त्यामुळे याची गुणवत्ता कुठेही कमी पडत नाही 
येत्या रविवारी नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेले दिवंगत आ. नारायण सुर्वे यांची पुर्वासंग्रहित ग्रेट भेट असणार आहे हे मला वाहिनीच्या संकेतस्थळावर कळाले. आपण माझ्या मतांशी सहमत असाल किंवा या लेखामुळे आपले भेटीबद्दल कुतूहल वाढले असेल, तर चला तर मग ... वाफाळलेल्या चहाच्या कपाबरोबर एका नवीन भेटीला ...   
जयदीप भोगले 

Monday, August 16, 2010

मास मिन्ग्लिंग - एका नव्या युगाची वाटचाल







आजच्या युगात ऑनलाइन क़िवा इन्टरनेट वर जाणारे लोक म्हणजे समाजपासुन  अलिप्त  किंवा एकलकोंडे असे उरले नाहीत . आता आपण एक विरोधाभासी आणि अत्याधुनिक चळवळ  अनुभवत आहोत. आज संपर्क तंत्रज्ञान लोकाना जोडून त्याना ख-या  अणि विस्तृत जगाशी संपर्कात आणण्याचा यत्न करत आहे.
संगणक ज्योतिर्भास्करानी एका दशाकापुर्वी सांगितलेले भाकित सत्यात उतरत आहे. आता लाखो लोक आपल्या जगण्याचा बहुतांशी वेळ ऑनलाइन घालवत आहेत नव्हे तर आनंदाने त्यात जगत आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की सर्व नवीन पीढ़ी घरकोंबडी  अणि समाजपरान्ग्मुख  होण्याकडे  वाटचाल करत आहेत,तर सामाजिक माध्यमे अणि मोबाइल संवाद एका सामाजिक मेळावा  या सज्ञेचे सिंचन करून  नवीन ऑनलाइन युगाची वाटचाल करत आहे.
याला व्यापारक्षेत्रात ' मास मिंग्लिंग' असे संबोधण्यात येते
या क्रान्ति मागील कारण शोधणेही तितकेच महत्वाचे वाटते. या क्रांतिचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकांची जनसंपर्कात राहण्याची आवड. मास मिंग्लिंग हे कुठल्याही प्रवृतिसारखेच लोकांच्या जनसंपर्कात राहण्याच्या आवडीमुळे   वाढते.
संगणकक्रान्ति अणि इन्टरनेट यामुळे  ही गरज  भागवणे लोकाना अधिक सोपे होऊ लागले आहे. याच कारणामुळे  लाखो लोक आपल्या आवडी निवडी, छंद, राजकीय विचारसरणी, आपल्या सौष्ठावाची माहिती मुक्तपणे प्रसिद्ध करून समविचारी हजारो मित्रमंडळे तयार करत आहेत.
काही आकडेवारी इथे नमूद करणे आवश्यक वाटते ( ही सर्व इन्टनेट जगतातील नेटवर्किंग संकेतस्थले आहेत )
ट्विट्टर -१० कोटि पेक्षा अधिक सभासद अणि ५० कोटि ट्वीट( शाब्दिक चकमक) रोज पाठवल्या जातात
फेसबुक -५० कोटि सभासद सरासरी प्रत्येकाला १३० मित्र आहेत व ती ५५ मिनिटे संकेतस्थलावर घालवतात, अणि यापैकी तीन जाने आपल्या जगातल्या पार्टीची आमंत्रने यावरून स्विकारतात.
लिंक्ड इन - साडे सहा कोटि सभासद अणि एका मिनिटाला एक नवीन सभासद सलग्न होतो.
आणि ही नवयुवा पीढ़ी  आपले अनुभव यूट्यूब , ब्लोग्स,फेसबुकच्या माध्यमाने जगाला कळवत  आहेत अणि हवे तेंव्हा हव्या त्या ठिकाणी पाहून आनंद लूटत आहेत
लोकांना खरे जग तेवढेच आवडते अणि हवे असते अणि त्यामुले ऑनलाइन तंत्राचा वापर लोक आणि व्यापारी जगत मीटिंग, सभा, पार्टी, मेळावा  या सर्वांसाठी करत आहेत. आज प्रवासी कंपन्या जगामधाला एक उत्तम व्यापार  होणे  संभाषण क्रान्तिमुळेच शक्य झाले आहे.
भारतामध्ये या युगाचा अनुभव किंवा परिणाम काही मोठ्या शहरात अणि अगदी तरुण पीढ़ीमध्ये बघायला मिळतो  पण पाश्चात्य देशात ही संस्कृति अधिकाधिक प्रगत व फैलावत चालली आहे.
कदाचित ही जगाला जवळ आणण्याची पद्धत काही पुराणमतवादी लोकाना अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला, भारतीय संस्कृतीवर प्रहार करणारी वाटू शकते पण आज असंख्य विद्यार्थी, ,नोकरिनिम्मित परदेशात राहणारे लोक यांचा दृष्टिकोण ही पडताळण्याची गरज आहे असे मला प्रकर्षाने नमूद करावे वाटते 
"ISD आणि STD च्या काळात क़िवा त्याआधी घड्याळाकडे  बघत बोलणारी, एका महिन्यनातर आलेले पत्र वाचत रडणं-या  आईची माया चांगली? की आज ऑनलाइन "chat करणारी ईमेल वर फोटो बघणारी भरारी अधिक चांगली ?याची बरोबरी करणे कठीण  आहे . शेवटी तंत्रज्ञान बद्लामुले मायेच्या ओलाव्याला कोरडेपण  कधीच येणार नाही असे मला सांगावेसे वाटते.
या अगम्य अणि अद्भुत जगाचे  आपण पुरोगामी विचारने स्वागत करायला हवे , तेव्हांच एक दिवस आपल्या भारतातल्या आईने केलेला दिवालिचा फराळ  आपली अमेरिकेतली मुलगी, बंगलौरमधला मुलगा, अणि जर्मनीमधला  भाऊ खात खात त्याच्या चाविबद्दल खुमासदार चर्चा ... ( नाही च्याट ) करत दिवाळी  साजरी करतील ...

जयदीप भोगले

Friday, August 13, 2010

अफलातून..?? तद्दन फालतू ....

कार्यक्रम - अफलातून लिटल मास्टर्स ( म्हणजे अगोचर मूले )
वाहिनी - ई टीवी
वेळ - बुधवार गुरुवार ९.३० रात्रौ

मित्रहो कदाचित हा लेख वाचून तुम्हाला माझे ई टीवी वहिनीबरोबर वैर किवा त्या वाहिनीबद्दल तुम्हा सर्वांचे मत कलुषित व्हावे अशी इच्छा आहे असे वाटणार किवा वाटू शकते. (कारण मी बाजीराव मस्तानी बद्दल ही फार शिफारसीचे लिहिले नव्हते.).
पण राजू परुळेकरांचा संवाद , "आठवणीतले बाबूजी.. हा शो , एके काळी ताजी असणारी मालिका -या गोजिरवाण्या घरात या मला मनापासून आवडतात ..अगदी आजही... म्हणूनच दोन्ही तर्क आपण मनातून काढून टाकावेत.
मी मराठी वाहिनी पाहणारा व त्याबद्दल प्रेम वाटणारा एक दर्शक आहे. कुठलाही अ-दर्शनीय कार्यक्रम पाहून मनाला वाटणारा विषाद मी आपल्यासमोर मांडतो. किवा चांगला वाटणारा कार्यक्रम,सिनेमा आपण पाहावा त्याचा आनंद लुटावा अशी माझी इच्छा असते.
तसा अफलातून हा कार्यक्रम सुरु होऊन बरेच दिवस झाले पण सुरवातीला अगदी वाईट मत ते ही लहान मुलांच्या कार्यक्रमाबद्दल छे छे .. म्हणून मी गप्प होतो . पण आता कालच हा कार्यक्रम पहिला आणि मला राहवले नाही आणि की-बोर्ड हातात घेतला ( पूर्वी लेखणी घ्यायचो .. जरा वाक्प्रचारात बदल)
आता जरा कार्यक्रमाबद्दल बोलतो की बोलावे हे जरा कठीणच आहे पण आता मीच सांगणार म्हणजे सांगणे भाग आहे.
काही अगोचर पोरे विनोदबुद्धी नसताना उगाच स्टेजवर येऊन धुडगूस घालतात . ब-याच वेळा त्यांना काय म्हणायचे आहे हे तुम्हाला जर कळले तर मला कळवा. त्यात सूत्रसंचालन असंभव मधील सुलेखा -नीलम शिर्के आणि एका पेक्षा एक छोटे चम्पिएन्स मधील छोटी मुलगी जमेल तितके अवसान आणून स्पर्धकांना चांगले म्हणतात. आता या दोघी कॉमेडी कार्यक्रमात सूत्र संचालन कशा आणि का करतात ? झी वाहिनीवर लोकप्रिय झाल्या म्हणून कदाचित ..
इंडिअन लाफ्टर च्यालेंज चा विजेते सुनील पाल आणि प्रेक्षकाच्या हृदयात आपल्या हास्याचे हळुवार फवारे मारणारे आपले लाडके प्रशांत दामले या कार्यक्रमचे मान्यवर परीक्षक ( दुर्दैवी) आहेत . या बिचा-यांना या मुलांना काय सांगावे तेच कळत नाही . सुनील पाल (हिंदी वाहिनीवरची सवय )असल्यामुळे बेमालूमपणे हसण्याचा उत्तम प्रयोग सादर करतात. प्रशांत दामले आपण लहानपणी कसे होतो ( उत्तम) आणि इथे कुठून आलो अशा हावभावात कार्यक्रम पुढे रेटतात.
तूमची विनोदबुद्धी अगदी सढळ मराठवाडी असेल तरी आपण त्या कार्याक्रमातील विसंगती आणि उगाच टाळ्या ( आधी वाजवून घेतलेल्या ) वाजवणाऱ्या प्रेक्षकांना बघून तुम्ही हसू शकता . लहान मुलांना प्रोत्साहन द्यावे हे कबूल आहे पण ते सा रे ग म प , एका पेक्षा एक , कलर्स मधील छोटे उस्ताद यांनी ही दिले पण त्या बरोबर प्रेक्षकांना मनोरंजन अव्वल दर्जाचे मिळावे याबद्दल ही दक्षता घेतली.
कुठलाही कार्यक्रम असो त्यातला गुणवत्तेचा दर्जा अगदी.. ग्रामीण भागात आवडणारा असला तरीही, चांगलाच हवा. माझ्या मते अगदी छोट्या मुलांना सुद्धा फाजील प्रोत्साहन देण्यात की अर्थ आहे.? कदाचित वाहिनीवर येण्याचा अट्टाहास आणि त्या चंदेरी जगाचे आकर्षण असल्यामुळे काही मुले अभ्यास चांगला करत असतील ,किवा चित्र काढत असतील तरी या सवंग प्रसिद्धीच्या मागे लागतात आणि त्यांचे पालक ही त्यांचे कौतुक करतात. म्हणूनच कि काय असले दर्जाहीन कार्यक्रम आपल्याला काही वाहिन्यांवर दिसतात .
आणि मी असे ऐकले आहे या कार्यक्रमाची  टी आर पी चांगली आहे ( हा एक विरोधाभास म्हणावा लागेल .)

आता माझे मत आपल्याला आत्यंतिक वाटत असेल तर आपणच पाहून खात्री करावी आणि कळावे .

जयदीप भोगले  म

Wednesday, August 4, 2010

मकरंद अनासपुरे- (अ पुणेरी ) मराठी भाषेचा ट्रेंड सेटर

 - मकरंद अनासपुरे-  (अ पुणेरी ) मराठी  भाषेचा ट्रेंड सेटर


मकरंद अनासपुरे नाव नुसते उच्चारले तरी हसू फुटते आजकाल ...!!!
.. ते या वल्लीच्या नावाने नाही... तर त्या नावाने डोळ्यासमोरून  जाणाऱ्या त्याने केलेल्या चित्रपटाच्या भूमिकेने. त्यांच्या बीड नगर च्या खास भाषाशैलीने ...
मला चांगले आठवते की मी रविवारी  इ टीवी वर " दि एंड चा शेवट " कार्यक्रम पाहायचो .. ताई  सांगयची  बीडी ( बीडच्या ) भाषेमध्ये एक तरुण त्यात संयोजन करतो आणि जाम मजा येते.
बीड माझे आजोळ त्यामुळे या माणसाची शैली मला भावून गेली आणि मी अगदी सुरवाती पासून या नटाचा ' पंखा ( fan ) झालो. 
मग यशवंत, सावरखेड- एक गाव यातल्या छोट्या भूमिका हि कुठेतरी  घर करून गेल्या. वास्तव मधली छोटीशी भूमिका आणि मकरंद अनासपुरेंची अंगकाठी बघून मजा आली
मी शिक्षणानिमित्त  दिल्लीला गेलो आणि मग मला कळले कि मकरंद हि वावटळ आता वादळवाट बनू लागली आहे . माझा विश्वास बसेना .. यासाठी नाही कि या वल्लीकडे प्रतिभा नाही.. पण कौतुक ऎकायची उपेक्षित मराठवाड्याला सवय नाही .... 
. शुद्धतेच्या पुणेरीपणा रांगडा सातारी आणि कोल्हापुरीपणा ... मुंबईचा आंग्ल मराठीपणा  आणि इरसाल नागपुरी खाक्या आमच्या मराठवाडी साधेपणाला जागा देतील यावर विश्वास बसेना... 
पण मी "कायद्याच बोला" पहिला आणि सर्व लख्ख झाले. हा मराठवाडी एकलव्य अभिमन्यू बनून चित्रपट क्षेत्राचे चक्र्व्युव्ह भेदून पार गेला होता. समोर मात्तबर कलाकार असूनही मकरंद अनासपुरेनी कायद्याच बोला ची  केशव कुन्थाल्गीरीकारची भूमिका अविस्मरणीय केली. त्याची संवाद फेकेची लकब . अस्सल मराठवाडी आणि गावरान म्हणी यांनी नटलेली पण अभिनयाने तितकीच सशक्त भूमिका त्याने करण्या सुरवात केली.
हा चित्रपट सुपरहिट ठरला ... मग तद्नंतर आलेले " बघ हात दाखवून ", "नाथ पुरे आता", " गाढवाचे लग्न "असे कित्येक चित्रपट तिकीट बारीला यशस्वी ठरले .. दादू इंदुरीकरांचे अजरामर नाटक चित्रपट म्हणून  सादर  करणे खायचे  काम नव्हते पण याने ते पेलून धरले. आणि म्हणूनच छोट्या छोट्या भूमिकेत हि अनासपुरे असावा चित्रपट निर्मात्यांना वाटू लागले. 
२००५ नंतर अनासपुरे भाऊंनी मागे वळून पहिले नाही. साडे माडे तीन ,दे धक्का , जाऊ तिथे खाऊ असे कितीतरी सुपर डुपर चित्रपट त्यांनी दिले. 
दे धक्का , गोष्ट छोटी .. यात गंभीर भूमिका करण्याचा चांगला प्रयत्न केला..
मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमातही मकरंद अनासपुरेचे एखादे तरी स्कीट एका झुण्क्यासारखे टीआरपी साठी वापरणे सुरु झाले . हास्यसम्राट सारख्या शो मध्ये  सुद्धा  या हास्य सम्राटाचे नाव परीक्षक म्हणून पुढे आले.
मकरंद अनासपुरेनी "लक्ष्या "गेल्यानंतर त्यांची उणीव लोकांना हlस्यादराबारात  जाणवू दिली नाही यातच त्यांना खरी पावती आहे .
आणि मकरंद अनासपुरेनी कॉमेडी मध्ये अपुणेरी इरसाल pattern   सुरु केला आणि म्हणूनच कि काय लोकांना भाषा पद्धतीने निर्माण होणारे विनोद भावू लागले.
 म्हणूनच हास्यसम्राट चा विजेता सोलापूरचा .. कित्येक चित्रपट नागपुरी खानदेशी भाषेला प्राधान्य देऊन बनू लागले. आणि भाषे मधला हेल, शब्द , अशुद्ध्पण नसून हा भाषेचा एक प्रकार आहे हे लोकांना कळू लागले . ते आवडू लागले . 
पुणेरी भाषा हो गोड भाषा नक्कीच आहे यात वाद नाही पण त्यामुळे इतर भाषांना ही आपला बाज आहे हे कुठेतरी अनासपुरे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर लोकांना पचू लागले.
आणि कदाचित यामुळेच मी मकरंद अनासपुरे याला एक ट्रेंड सेटर मानतो आणि कदाचित 
यामुळेच तो एक सम्राट आहे कॉमेडी सम्राट......
जयदीप भोगले

Tuesday, August 3, 2010

सा रे ग म (प)ल्लवी शिवाय ???




मराठी वाहिनीवरच्या विश्वात लोकप्रियतेचा एक नवीन उच्चांक गाठणारा, मराठी माणसात विशेष स्थान निर्माण केलेला, झी मराठी वरचा आयडिया सारेगमप एक नवीन पर्व पुन्हा एकदा लिटल च्माप्स "आपल्यासमोर घेऊन येतो आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नाविन्य दाखवत झी मराठीने हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी नेहमीच ताजा ठेवला आहे . हे नवीन लिल-चाम्प पर्व सर्वांच्या लाडक्या पल्लवी जोशी बरोबर असणार नाही हे या वेळेच्या सा रे ग म प च्या महा अंतिम फेरीमध्ये सांगितले गेले.

पल्लवी जोशींनी गेली आठ पर्व आपल्या सूत्रसंचालन शैलीने , टाळयांच्या विनंतीने गाण्याइतकीच मधुर केली.हे  नक्कीच रसिक कायम लक्षात ठेवतीलच .पण  कदाचित हा बदल पल्लवी च्या चाहत्यांना रुचणार नाही. मला माझ्या मित्रांच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या के त्यांना हे विचित्र वाटले ( आवडले नाही असे नाही :) ). आणि कोणताही बदल सहजगत्या न रुचणे स्वाभाविक आहे.
आत्ताच संपलेल्या पर्वाच्या शेवटच्या भागात मान्यवर परीक्षक अन्नू कपूर आले होते . भागाच्या शेवटच्या सीनमध्ये पल्लवी आणि अन्नू कपूर यांना पाहून कदाचित पल्लवी यानंतरच्या पर्वात असणार नाही असे कुठेतरी वाटून गेले. झी हिंदी वाहिनीवर अन्नू कपूर आणि पल्लवी यांनी अंताक्षरी गाजवली होती. पण नव्या काळाप्रमाणे ट्रेंड प्रमाणे त्यांना निरोप देण्यात आला. पण माझ्या मते बदल हि नाविन्याची जननी आहे. आणि झी मराठीने केलेला हा बदल कदाचित चांगलाच आहे असे कुठेतरी नवीन पर्वाच्या जाहिरातीवरून जाणवते.

अथर्व आणि मुग्धा वैशंपायन या पर्वाचे सूत्र संचालन करणार आहेत. मुग्धाने गेल्या पर्वात आपल्या आत्मविश्वासाने आणि गोड गळ्याने रसिकांच्या मनाला मुग्ध केले होते कदाचित तिचे सूत्र संचालन तिच्या बालिश शब्दांनी अजून खुलेल आणि हेच आकर्षण ठरेल.
अथर्वने एका पेक्षा एक चे छोट्या मुलांचे पर्व यशस्वीरीत्या पार पाडले त्याची जोडी म्हणचे अवखळ चिंच गुळाच्या जोडी सारखीच आंबट गोड जाणवेल.

जुन्या संगीतकारानंतर नवोदित संगीतकारांनी जशी संगीताची धुरा सांभाळली त्याचप्रमाणे नवीन बदल कदाचित नवीन काहीतरी घेऊन येईल.रामानंतर श्रीकृष्ण अवतार ही त्या काळाची गरज होती.
आणि सा रे ग म प चे यश हे केवळ सूत्र संचालनाचे नसून त्यातील संगीताच्या दर्जावर स्पर्धकांच्या गुणवत्तेवर आणि मान्यवर परीक्षकांच्या मतांवर जास्त अवलंबून आहे . त्यामुळे हा बदल बहुतेक सुखदच असेल .. त्यामुळे " आता पल्लवी नको" अशी प्रतिक्रिया येण्यापेक्षा तिने अविस्मरणीय केलेल्या सोनेरी क्षणांना सुखद आठवण बनुवून नवीन पर्वाचे स्वागतच करायला हवे.

झी मराठी ला नव्या पर्वासाठी शुभेच्छा
समीक्षा, मराठी

जयदीप भोगले

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...