Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Wednesday, April 14, 2021

महामानव

 महामानव


घटनेचा अविष्कार

मनुचा बहिष्कार

मानवतेचा पुरस्कार

वर्णव्यवस्थेचा तिरस्कार


 शिक्षणाचा सुविचार

 अर्थशास्त्राचा साक्षात्कार

  आधुनिक बिंबिसार

महामानवाला  नमस्कार


14 एप्रिल 2019

जयदीप भोगले



Sunday, July 5, 2020

मला उमजललेले गुरू"



गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतात गुरुबद्दल कृतज्ञ होण्याचा दिवस..

आपण जे काही आहोत ते आपल्याला कुणी तरी केलेल्या संस्कारामुळे ,कधी जाणतेपणाने असतील किंवा कधी नकळत होणाऱ्या अनुभवाने सुदधा असतील ,त्याची एक आठवण ठेवून त्याबद्दल आभार मानायचा दिवस.

' आजकालच्या secret  असू देत किंवा  बुद्ध धर्माची ' lotus sutra' असू देत " Gratitude" या संकल्पने ला सर्वात जास्त महत्व दिले आहे .या धर्तीवरच की काय आपल्या संस्कृती मध्ये  सुदधा व्यासपूजन व गुरुपूजन, त्याबद्दल असणारी  कृतज्ञता व्यक्त  करावी म्हणून हा दिवस राखून ठेवला आहे.

गुरू म्हणजे शिक्षक जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो मग ते पहिले पाऊल टाकायला शिकवणारी आई असेल की, पहिल्यांदाच रस्ता ओलांडायला शिकवणारे बाबा असतील . पहिली बाराखडी शिकवणाऱ्या आपले गुरुवर्य की अगदी आपल्या सध्याच्या व्यावसायिक  जीवनात आपले न भावणारे वरिष्ठ असो यांचे अपल्यावर कळत नकळत संस्कार होत असतात त्यातून आपण घडत असतो.
गुरू  आपल्या संपर्कात येणारा मूर्त माणूस सुदधा असतो किंवाआपली कर्मभूमी, आपल्या अवतीभवती असणारा समाज, अगदी निसर्ग हा सुदधा आपल्या वर गुरुप्रमाणे संस्कार  करतच असतो व तो सुदधा कधी आपल्या गुरूस्थानी जातो हे कळत नाही त्यांना सुदधा धन्यवाद देण्याचा दिवस.

 ज्योतिष शास्त्रात सुदधा गुरू ला फार वरचे स्थान दिले आहे आणि असे म्हणतात गुरू ज्या स्थानावर दृष्टी टाकतो ती शुभच असते  आणि म्हणूनच गुरु ही व्यक्ती असो की अमूर्त शिकवण, ती वयक्तिक रित्या कशीही असो ती जेव्हा गुरुस्थानी येते ती कायम आपल्याला नवीन काहितरी देऊन जाते . मग कधी काय करावे असेल तर कधी काय करू नये सुदधा..

गुरू शिष्य नात्यात बऱ्याच वेळा किंवा नेहमीच म्हणा शिष्याला जास्त प्रकाशझोत मिळतो मराठीमध्ये "Limelight"... आणि मग लोकांची गाडी वळते अरे याचा गुरू कोण ?? मग काही जण त्याला अमूर्त स्वरूप देतात व काही द्रोणाचार्य रूपी मूर्त व्यक्ती कडे नतमस्तक होतात.  सर्व ठिकाणी त्याच्या प्रत्येक वळणावर त्याला असंख्य गुरू भेटतात  व या सर्व गुरूस्थानी असणाऱ्या लोकांना स्मरण्याचा हा दिवस.

 त्यामुळे आपल्या धकाधकीच्या आयुष्यात जर आपल्याला प्रश्न पडला असेल माझा गुरू कोण ?? आजकाल गुरू शिष्य परंपरा नाहीच उरली .. गुरू असं काही म्हणावं असं काही कुणी मला समोर येत नाही... त्या सर्व जणांना आपला लहानपणापासून ते आत्तापर्यंत  डोळे बंद करून तुमच्यात बदल घडवणारे आईवडील असो की अगदी  कायम वेळेवर धावून आपल्याला वक्तशीरपणा शिकवणारी मुंबई लोकल असेल ही सुद्धा गुरुस्थानी मानून कृतज्ञ व्हायला हरकत नाही .
आणि ज्यांना आपले प्रमुख गुरू वंदनीय असतील त्यांना वंदन करून काही गुरुवर्य जे तुमच्या आठवणीत मागे पडले असतील त्यांना त्रिवार वंदन करून कृतज्ञ व्हायला हवे

कारण एक कृतज्ञ  शिष्यच आपल्या गुरुला सर्वोत्तम बनवतो .


जयदीप भोगले
5 जुलै 2020

Sunday, February 17, 2019

ध्यासपर्वाची विलक्षण अनुभूती -आनंदी गोपाळ



निर्मिती -फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज
दिग्दर्शक- समीर विद्वंस
कलाकार - ललित प्रभाकर ,अंकिता गोस्वामी आणि भाग्यश्री मिलिंद आणि गीतांजली कुलकर्णी
संवाद -इरावती कर्णिक
गीते- वैभव जोशी संगीत -हृषीकेश दातार जसराज जोशी

प्रत्येकाने पहावा व दुसऱ्यांना दाखवावा असा

डॉ आंनदी बाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर असं हुशार मुले ,सामान्य ज्ञान असणारी जिद्यांसू मुले , यांना हे नाव कदाचित परिचित असेलच..

पण एखादं नाव नावारूपाला येण्याआधी त्यामागचा संघर्ष ,तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असून त्यावर केलेली मात आणि ही ज्ञानगंगा चित्रलोकी आणण्याचं काम करणारा भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी  ( आनंदी बाईंचे पती ) या सर्वाचं सिंहावलोकन करून 2 तास 14 मिनिटात त्याचा एक बायोपिक पाहुन जेव्हा नतमस्तक व्हाव वाटतं  ती कलाकृती म्हणजे "आनंदी गोपाळ "
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे असणाऱ्या अगणित माता पत्नी शिक्षक यांची मोठी यादी आपल्याकडे नक्कीच असते पण  150 वर्षांपूर्वी आपण शिकू शकतो हे मनाला शिवत सुद्धा नाही अशा स्त्री ला आपल्या काहीशा जिद्दी हेकेखोर टोकाच्या आणि तऱ्हेवाईक दृष्टीकोन ठेवुन डॉक्टर बनवणारे वल्ली भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी .  या जोडप्याच्या ध्यासाची आणि त्यांच्या प्रवासाची अत्यंत प्रभावशाली गोष्ट म्हणजे चित्रपट ..आंनदी गोपाळ

... चित्रपट म्हणून एक उत्कृष्ट कथा, त्यामागची भूमिका जाणून केलेलं जाणतं दिग्दर्शन ,ते घडताना तोच दृष्टीकोन दाखवणारं  डोळस छायाचित्रण, या छायाचित्रणाला 150 वर्षापूर्वी घेऊन जाणारे अत्यंत प्रभावी असे कला दिग्दर्शन आणि वेशभूषा, या सर्व गोष्टीला साजेसे हृदया व मनाला हलवणारे संवादलेखन व गीतलेखन
व या पंचमहाभूतातून बनलेले व्यक्तिचित्र आणि त्या भूमिका जगणारे ललित प्रभाकर ,भाग्यश्री मिलिंद, गौरी कुलकर्णी
या मुळे अतिशय उत्कृष्ट चित्रनिर्मिती  म्हणजे… आनंदी गोपाळ

उंच माझा झोका सारखी सारखी उत्कृष्ट मालिका सासू सून झंझावात असताना सुद्धा झी मराठीने प्रवाहाविरुद्ध निर्माण केली आणि त्याच सोनं केलं या झी समूहाने या विषयाला भक्कम निर्मिती साथदिली हेंसुद्धा त्यांनी गोपाळराव जोशी यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यासारखं आहे असं मला इथं म्हणावं वाटतं

हा सिनेमा हा फक्त त्या काळाचं दर्शन व जाणीव किंवा डॉ आनंदीबाई जोशी  यांना वंदन करून थांबणारा नक्कीच नाही तर अजूनही प्रत्येक पुरुषाला महिलांना समान संधीच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे हे सांगणारा सुदधा आहे.
अजून सुद्धा आपली संस्कृती “पंचकन्या स्मरे नित्यम” म्हणणारी जरी असली तरी काचेचं छप्पर देऊन तिला रोखणारी सुद्धा तितकीच आहे हे सगळ्या पुरुषांना कळत नकळत माहीत असेलचं..
कदाचित म्हणूनच चित्रपताशेवटी असणाऱ्या काही वेधक छायाचित्रात अजूनही पहिली महाराष्ट्राची मुख्यमंत्री स्त्री नाही हे कुठतरी जाणवून जातेच..
पण हा सिनेमा पाहून आल्यावर उद्या जर आपल्या घरातील स्त्री ची कुठलीही महत्वाची मीटिंग काम असेल तर तिचा डबा जरी घरच्या पुरुषाने भरून दिला तर चित्रपट निर्मितीचा सर्व खर्च कारणी लागला असं निर्मात्यांना  म्हणावं लागेल..

हे सर्व वाचल्यावर आणि आनंदी गोपाळ सिनेमागृहात पाहिल्यावर कदाचित तुमच्या मधला सकारात्मक गोपाळ जागा होईल व तुमच्या जवळच्या आनंदीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना...

जयदीप भोगले
17 फेब्रुवारी 2019

Monday, January 14, 2019

पतंग


पतंग होऊनि उडे अस्मानी
दुनिया बघते होऊन दिवाणी
सैर सपाटा पतंग करतो
परी, मांजा पकडे एक शहाणी
म्हणे कशी ती तू स्वछन्दी
पवन अश्व तो अन तू आनंदी

म्हणतो पतंग हळूच पामर
तुझाच मांजा ...मी  गं ..चाकर
उंच उडतो.. अन मिळते संधी
पण अस्मानी मी तुझाच बंदी
पतंग आहेत बहुत अस्मानी
पण दोर सांभाळी त्यांचीच राणी
जगास  भव्य  ते नाट्य दिसे
पण घरीच बनते त्याची कहाणी
सर्व पत्नी लोकांना सर्व पतंग सम पती  जमातीच्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
जयदीप भोगले
14 जानेवारी 2019

Thursday, January 3, 2019

लग्न (लग्नसराई साठी खास)

मी म्हणाले एकदा
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ ???
सगळे म्हणाले ..आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी म्हणाले..
आता त्याला हो म्हणून बसलीय
येवल्याची पैठणी आणि पेठयांची ठुशी घालून बसलेय
काही नवीन तुझ्याकडे असेल तर मला छान सांग पाहू..
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ???

भाऊ म्हणाला

लग्नानंतर आपला प्रियकर एकदम नवरा च बनून जातो
ताई सारख्या लोकांना चक्क "साली" म्हणू लागतो
डेमो एकदम असतो छान..  2 लेवल पेक्षा जास्त खेळून नको पाहू..
सगळे म्हणाले.. आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी आता म्हणाले आता काय करावे ??
बोहल्यावर  चढल्यावर मागे का फिरावे ?
पीएचडी पर्यंत शिकतेय आता ही सुदधा परीक्षा देऊनच पाहू.

सगळे म्हणाले आम्ही फसलोय तू तिथे नको जाऊ.

इतक्यात एक मला आजोबा आजी दिसले
आजीना माळून गजरा शेजारी जाऊन बसले

आजोबा म्हणाले

50 वर्ष झाली एकत्र ..पण अजून पुढं जायचं आहे
पॅरिस च आयफेल टॉवर दोघांना एकत्र बघायचं आहे
भांडण वाद आणि वैताग मी जरा बाजूलाच ठेवतो
कारण हिच्यासारखा चहा जगात कदाचित कुणाला येतो?

विश्वास आणि प्रेम असलं की जोडपं होतं मनमिळावू...

जयदीप भोगले
24 dec 2018

Sunday, November 18, 2018

प्रोजेक्ट जैतापूर

 ...

"खेड्याकडे चला" असं वाक्य कृत्तिका च्या कानावर पडलं.. कॉलेज ची वक्तृत्व स्पर्धा आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यासमोर चौकडा हाफ शर्ट घालून आवेशाने बोलणार अनिकेत होता . बोलके डोळे , खांद्यावर रुळणारे मोकळे केस , भुवयांच्या मधोमध शांती लावते तशी बाण असलेली टिकली आणि खळखळून हसणारे क्लोजप स्माईल असणारी कृत्तिका, हिची स्वप्न तिच्या डोळ्यात असणाऱ्या अनिकेतपेक्षा नक्कीच निराळी होती.
दोघे जेव्हा एकत्र झी मराठी पहायचे त्यावेळी "चमकत रहा" ची जाहिरात पाहून रंगत जाणारी स्वप्न तिची व अनिकेतच्या हातात प्रकाशवाटा व डोळ्यात वाढत जाणारा निर्धार दिसायचा.
ती नेहमी म्हणायची 12 वी नंतर मला मुंबईत जायच आहे,  MBA  करायचं आहे मोठ्या कंपनीमध्ये नोकरी, सगळं मोठं हवं .आपण खेड्यात आहोत म्हणून काय झालं? शहरात हुशार आणि मेहनती लोकांची कदर असते, पैसा मिळतो आणि.. हो खेड्यात असणाऱ्या नजरा सुद्धा नसतात बरका ??
आणि अनिकेत एक स्मित द्यायचा आणि म्हणायचा शहर म्हणजे त्या फुगणाऱ्या बेडकी सारखं झालय कधी फुटेल नेम नाही.. खेड्यात जर विकासाला चालना मिळाली तर एक वेगळ्या महाराष्टची निर्मिती होऊ शकेल . आपण चांगल्या समाजात जाण्यापेक्षा आपण जाताना लोकांना एक नवीन समाज देऊन जावा असं मला वाटतं. गांधीजीपासून ते प्रकाश आमटे यांनी लोकांनी मोठं म्हणावं म्हणून काम कधीच केले नाही .तेवढ्यात अनिकेतच्या आईच्या चहाने त्यांच्या भिन्न विचारांना समान पातळीवर आणले  मग दोघे हसले . कृतिका म्हणाली अहो समाजसुधारक साहेब तुमचे विचार चांगले आहेत पण बाजूला ठेवावे लागतील 12 वीच्या परिक्षेचे वेळापत्रक आले आहे . आणि म्हणाली चल मी निघते.. बाबा आले असतील .
कृत्तिकाचे बाबा स्टेट बँकेत बदलीवर जैतापूर ला आलेले आणि अनिकेत चे बाबा 8 एकर कोरडवाहू जमिनीचे भूमिपुत्र .एकिकडे पहिल्या तारखेची वाट  बघणारे बँक अकाउंट आणि एकीकडे पावसाची वाट पाहणारे बळीराजाचे डोळे अशी अवस्था असताना या दोघांचे मैत्रीचे सूर कसे जुळले याचं सगळ्या जैतापुर ला आश्चर्य होतं. पण फ्युजनच हे एकदम मराठमोळे उदाहरण होतें.हळूहळू अभ्यासाच्या रात्री वाढू लागल्या, हसण्याचा आवाज बदलून डिस्कशनचा झाला दिवस सरले  परीक्षा संपली दोघे 12 चा शेवटचा पेपर देऊन बाहेर आले .अनिकेत म्हणाला चला चहा घेऊ या, ती म्हणाली नको.. मी घरी जाते .  त्यावर तो म्हणाला चल मी सुद्धा येतो बरेच दिवस झाले सिनेमा सुद्धा पाहिला नाही . टीव्ही लावला तर, झी मराठीवर प्रकाश बाबा आमटे आणि झी टॉकीजवर टाईमपास .इथं सुद्धा कृत्तिकाची परीक्षा टीव्ही वहिनी सुद्धा घेतेय असं चित्र होतं.तेवढ्यात कृत्तिकाचे बाबा बँकेतून आले आणि म्हणाले काय अनिकेत कशी गेली परीक्षा? तुमच्या परीक्षेच्या निकलाआधी आमची परीक्षा आम्ही पास झालो असं दिसतंय.  म्हणजे काका? मी समजलो नाही. अरे बँकेने माझी बदली मुंबईला केली आहे पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचंय . मग अनिकेतला कृत्तिका गप्प का याचं कारण लक्षात लागलं.मग 12 वी नंतर काय? ये मुंबई ला.. तिथे चांगली वसतीगृह सुद्धा असतात.you have  good future. नाही काका जैतापूर  च्या शेतकी कॉलेजचा राज्यात वरचा क्रमांक लागतो मी इथेच शिकायचं ठरवलं आहे अनिकेत उत्तरला. माझ्या भविष्यापेक्षा माझ्या गावचं, राज्याचं भविष्य मला जास्त महत्वाचं आहे.बाहेर जाताना तो कृत्तिका ला म्हणाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,आभाळाचा रंगावरून पावसाचा अंदाज बांधणारा तू जा. तुला तुझी स्वप्न आहेत ती पूर्ण मुंबईतच होतील. टाईमपास पाहत होतीस ना टक लावून ?.अंग मला कळतं तुझ्या मनातलं.. पण टाईमपास एक कथा आहे आणि प्रकाश बाबा आमटे ही सत्यकथा.अव्यक्त असून दोघांना उमजणाऱ्या प्रेमाला स्वप्न आणि ध्येय याच्या क्रॉसिंगवर  थांबावे लागले.नेमका त्याच दिवशी आलेल्या वळवाच्या पावसाने दोघांच्या अश्रूंना लपवून टाकले. दिवस पालटले अनिकेत व कृत्तिका दोघे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले . त्याने शेतकी कॉलेज व तिने बेडेकर कॉलेज ला प्रवेश घेतला .मधल्या काळातल्या कोरड्या दुष्काळात हळूहळू दोघांचे जग वेगळे बनले. वक्तृत्व स्पर्धेची जागा आंदोलनाच्या भाषणाने घेतली . जलयुक्त शिवार, शेततळी, कोरडवाहू शेती प्रयोग असे वेगळे विचार जैतापूर ला वाहू लागले. अनिकेत चा 5 वर्षात अनिकेत दादा रूपांतर झाले.  मुंबईत  सुद्धा कृत्तिका एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रूजु झाली.एकाची जमिनीवर राहण्याची व एकीची गगनभरारी घेण्याची धडपड सुरू झाली.कृत्तिका खरंच चमकत रहा च्या जाहिरातीप्रमाणे तिच्या कंपनीमध्ये चमकत होती.रात्री उशिरा काम करून परत येताना आलिशान कार मध्ये कृत्तिका ला अधूनमधून जैतापूर च्या आठवणी यायच्या . "खेड्याकडे चला" हा आवाज घुमायचा पण नंतर पुन्हा “डेडलाईन” हा राक्षस  सगळ्या आठवणींना  मागे टाकायला भाग पाडायचा.
हळूहळू राजकारण हे ऑफिस आणि जैतापूर या दोन्हीकडे शिरकाव करत होते .एकीकडे समाजकारण आणि एकीकडे अर्थकारण या जगात योग्य राजकारण किती महत्वाचे आहे हे एका ध्येयवेड्या व एका स्वप्नवेडीला समजावत होते. खेड्याला योग्य न्याय हवा असेल तर योग्य  व्यासपीठ शहरात आहे, मंत्रालयात आहे हे विचार प्रोजेक्ट जैतापूर- चळवळ चालवणाऱ्या अनिकेतच्या मनात घर करत होते. राजकीय वर्तुळात सुद्धा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख वाढत होती .कृत्तिका तिच्या कंपनी मध्ये शेतमालाच्या भावांमध्ये होणाऱ्या अवमूल्यनामुळे उद्विग्न होत होती . सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला खरा भाव न देता organic म्हणून माल दुप्पट नफ्याने विकणाऱ्या लोकांची तिला चीड येत होती .
या दरम्यान अनिकेतचे आमदार म्हणून निवडून येणे , वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्याच्या प्रोजेक्ट चे होणारे कौतुक कृत्तिका च्या नजरेसही पडले होते. या गोष्टीचे कौतुक व आश्चर्य दोन्ही तिला होतेच पण काळाबरोबर त्यांचे मार्ग बदलले होते कदाचित फोन नंबर सुदधा...
 १२ वी मधला अनिकेत तिला नेहमी आठवायचा शेतकऱ्याबद्दल तळमळ आठवायची व सगळ्याचा उद्रेक होऊन तिने एक दिवस धाडस करून कोर्पोरेट दुनियेला रामराम ठोकला व तिने शेतकऱ्यांच्या मालाला नीट भाव मिळावा यासाठी NGO स्थापन केली व तिचा सुद्धा पहिला प्रोजेक्ट होता.. प्रोजेक्ट जैतापूर .
त्याच दिवशी मुख्यमंत्रि महोदयांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली आणि  अनिकेत ने कृषिमंत्री पदाची शपथ घेतली .वर्तमानपत्रात मथळा होता प्रोजेक्ट “जैतापूर चळवळीचे प्रणेते अनिकेत पाटील यांची कृषिमंत्री म्हणून नियुक्ती”
.दोघांची स्वप्न व ध्येय प्रोजेक्ट जैतापूर या समान नावाने का होईना पुन्हा नव्याने कदाचित एका वाटेवर  आली होती.

जय
१८ ऑगस्ट २०१८

Friday, November 9, 2018

आणि .... सुबोध भावे


चित्रपट:    आणि... काशिनाथ घाणेकर

कलाकार ...सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी आणि बरेच मातब्बर कलाकार


दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे


पाहावा की नाही: 'तुला पाहते रे पाहता का ?? ' मग उत्तर मिळेल..

नावात काय आहे असं बरेच जण सांगतात अनुभवतात पण जेव्हा एखादा बायोपिक तयार होतो त्याच्या नावातच सगळं असतं कुतुहुल, कथा, आठवणी ,परीक्षा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यासाठी दिग्दर्शक ते प्रेक्षक "याजसाठी केला अट्टहास" म्हणत असतात.

बहुचर्चित व दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट,  बऱ्याच जणांच्या लाडक्या असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांची कथा सध्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मध्यमवयीन देखणा  आणि घाऱ्या डोळ्याचा नट सुबोध भावे साकारतो आहे म्हणजे कुतूहल व परीक्षा या दोन्ही गोष्टी  शिगेला असणारच..

यात काशीनाथ घाणेकर यांचा डॉक्टर ते ऍक्टर असा प्रवास.
सिगरेट च्या धुरासारखं उडत जाणारं वलयांकित  आयुष्य.
दारूच्या घोटसारखी  अर्थशात्रच्या इंजिल लॉ ऑफ consumption ला खोटे ठरवणारी अफाट प्रसिद्धी...
व उंच अशा धबधब्याजोगी प्रसिद्धी ते नाराजी असणारी त्यांच्या जगण्याची बेफीक्री या सगळ्याचा मिलाफ म्हणजे आणि डॉ काशीनाथ घाणेकर...

बालगंधर्व ,लोकमान्य आणि काशिनाथ या तीन भूमिका तितक्याच वेगळ्या पद्धतीने साकारणारे सोने म्हणजे सुबोध भावे . बालगंधर्व सम गळ्यातला लक्ष्मी हार असू दे की सोनेरी मानपत्र असलेलं लोकमान्यांचं आयुष्य... आणि हेवा वाटणारं व कधीही हरवेल अस मनगटात असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांचं ब्रेसलेट ...या सगळ्याची घडण सुबोध भावे यांच्या बावनकशी सोन्यातूनच घडलीय आणि एकदम शोभलीय सुद्धा..

स्क्रीनभर पुरून उरणारा सुबोध भावे , दिवाळीच्या फराळाच्या थाळीत असणारा प्रत्येक पदार्थ जसा आवश्यक असतोच आणि एकदम जमून जातो असे सर्व कलाकार व त्यांचे अभिनय  यामुळं सिनेमा मराठी रसिकांना पसंतीस पडेल हे नक्की..

सिनेममधली गाणी थोडासा रटाळ वाटणारा शेवट व फक्त अश्रू आणि संभाजी यावर सुपरस्टार होणारं डॉक्टरांच आयुष्य या गोष्टी खटकणा-या वाटतील सुदधा पण परिपूर्णता म्हणजे पूर्ण विराम .. त्यामुळे कलाकृती उद्गारवाचक , प्रश्नार्थक असणं जास्त चांगलं असं मला नेहमी वाटतं...उसमे क्या है !!!!

डॉ साहेबांनी रंगभूमीला पुष्कळ काही दिलं पण त्यांच्या धुरकट व प्यालाच्या  चष्म्यातून पाहिलेल्या आयुष्यामुळे आम्ही तरुण एका मोठ्या नटाला रंगभूमीवर पाहायला मुकलो याची खंत नक्कीच वाटते.

चित्रपटात एक स्वगत आहे की टाळी ही कलाकाराला सरस्वतीने दिलेला शाप आहे .
पण खरं तर सुधाकरापासून काशीनाथपर्यंत (बाकी सुद्धा बरेच) लोप पावणारे  स्पिरीट चे दिवे पाहिले की कळते की सुरा हाच कलेला न कळलेला  शाप आहे.

अर्ज किया है

ए गालिब तू वली होता
अगर तू बादाखार न होता

सुबोध भावे यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।

जेडी
9 नोव्हेंबर 2018

Sunday, October 28, 2018

सोनेरी क्षण





पहिल्या प्रेमाच्या सोनसाखळीतून
 सुवर्णमहोत्सवी संसाराच्या नथीतून
 भरघोस बोनसच्या हिऱ्याच्या कुडीतून
सोनेरी क्षण असेच बनतात अतूट प्रेमातून

आईच्या साठवलेल्या स्त्रीधनातून
कधी सासूबाईंच्या लक्ष्मीहारातून
ओवाळणी दिलेल्या गुंजभर सोन्यातून
सोनेरी क्षण असेच दृढ होतात अतूट प्रेमातून

शीलंगणाच्या अक्षय वळ्यातून
 गुरुपुष्याच्या वाढणाऱ्या मण्यातून
दिवाळीच्या लाजणाऱ्या ठुशीतुन
सोनेरी क्षण असेच वाढतात अतूट प्रेमातून

कधी हिऱ्यातून कधी सोन्यातून
कधी शुभ्र अशा चांदीतून
सोनेरी क्षण सदैव टिकतात WHP च्या सोबतीतून


जयदीप भोगले
4 ऑक्टोबर 2018

Sunday, September 16, 2018

यांत्रिकी आणि अभियांत्रिकी



अभियंता बनलो पण अभियांत्रिकी जमलीच नाही
माणसाच्या नादात मशीनची भाषा ऐकलीच नाही

रेफ्रिजरेशन आणि ऐरकंडिशनिंग हे नेहमीच राहू केतू वाटले
मशीन ड्रॉईंग पाहताच मला नेहमीच ब्रह्मान्ड आठवले
भावनांचे आणि ऑइल चे एकत्र कधी जमलेच नाही
माणसाच्या नादात मशीनची भाषा ऐकलीच नाही

 इंजिनिअर डे च्या दिवशी असलेच पंछि मला दिसतात
आपली ब्रँच सोडून हे सगळे दुसऱ्याच झाडावर बसतात
यांच्या शिक्षणाचे आणि करणाऱ्या नोकरीचे सूत कधी जुळलेच नाही
माणसाच्या नादात मशीनची भाषा ऐकलीच नाही

पण गॅरेज मधले  मेकॅनिक आणि कारपेंटर जेव्हां दिसतात
डिग्री घेतात अभियंता पण खरे अभियांत्रिकी हेच जगतात
मार्कंच्या जगात खरे टॅलेंट दिसलेच नाही
कॉलेज आहेत पुष्कळ पण विश्वेश्वरय्या उरलेच नाही!!!

सर्व मिसफिट इंजिनिअर लोकांनां आणि खऱ्या इंजिनिअर लोकांना इंजिनिअर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
15 सप्टेंबर 2018


Wednesday, August 15, 2018

देशभक्ती व देहभक्ती



१५ ऑगस्ट जवळ आला की उगाच देशभक्तीपर गीते तिरंगी झेंडे ,जय हिंद चे फेसबुक स्टेटस आणि हो ..आजकालचे मनापेक्षा वेगाने पुढे जाणारे व्हाट्सएप मेसेजेस यात वाढ व्हायला लागते .हा दिवस फादर मदर आणि रोज या सारखाच एकदिवसाचा बनतोय असं मला नक्की वाटतंय.

आता हेच पहा ना हा लेख मी कदाचित जुलै महिन्यात सुद्धा लिहिला असता पण मला बरोबर 15 ऑगस्ट च्या तोंडावर सुचतोय म्हणजे मी सुदधा फार काही वेगळा नाही ,
पण देशभक्ती किंवा एकूण भक्ती या गोष्टीवरच चिंतन करावं असं मला वाटतंय म्हणून हे सगळं मनातलं मांडण्याचा खटाटोप .

मी माझ्या मुलाला जागृती सिनेमाचं आओ बच्चे गाणं दाखवतं होतो त्यावेळी त्याने मला विचारलं बाबा हे बलिदान म्हणजे काय असतं??
लहान वयात बलिदान वगैरे समजणं त्याला कठीण आहे मला कळत होतं ,पण मग त्यावरून मला लक्षात आलं की सध्या आपण एकूणच समाजाभिमुख भूमिकेकडून वयक्तिक दृष्टिकोन ठेवत आहोत .
 वयक्तिक दृष्टिकोन इतका जवळचा झालाय की माझा फोन ,माझा प्रोग्रॅम, माझा वेळ, माझी प्रायव्हसी अगदी माणसाचे गोल सुद्धा पर्सनल गोल्स बनत आहेत.
 आता इतकं जर वयक्तिक आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बनत आहोत तर देशभक्ती सारखी अत्युच्च आणि समजायला कठीण अशी भावना मनात तयार होणे नक्कीच कठीण आह.
यात लोकांची किती चूक आहे हे मला सांगायचं नाही पण हेच कदाचित हळू हळू सर्व स्तरांवर होणाऱ्या बोथट भावनांचं कारण आहे असं मला वाटतं आहे

पहिल्यांदा येते शेअरिंग मग येते सामावून घेणे ते कळते तेव्हा त्याग समजायला लागतो व या सगळ्या गोष्टी जेव्हा एकदम रुजतात त्यावेळी खरी देशभक्ती ची भावना रुजायला लागते

देहभक्ती व वयक्तिक सुख व समाधान या सर्वात महत्वाचा वाटणारा विचार देशभक्ती कशी घडवून आणू शकतो कदाचित आणणे कठीण आहे .

आजकालची असणारी पोकळ आरक्षणे व समाज निदर्शने यात सुदधा फक्त वयक्तिक स्वार्थ यापेक्षा कुठलाही विचार समोर येतो आहे असं मला जाणवत नाही.

परदेशी कापडाची होळी व चरखा आणि खादी वापरण्याचा विचार असेल किंवा स्वतःच्या देशाच्या शिक्षण संस्था असाव्यात असा टिळकांचा व्यापक विचार असेल यात प्रत्येक ठिकाणी त्याग व सामावून घेण्याची भावना दिसून येते ती नक्कीच कमी झाली आहे.

समाज प्रगत होतो आहे . स्त्री जास्त स्वतंत्र होते आहे वेगवेगळ्या विचारामधले स्वातंत्र्य हे नक्कीच दिसून येते आहे .
पण भारत स्वतंत्र जरी होत असेल तर आपण स्वतः किती देशभक्त होत आहोत हे आपण अगदी आपल्या सार्वजनिक मालमत्तेच्या वापर असो की त्याचे होणारे नुकसान असो याच्या विषयी असणाऱ्या आस्थेवरून  आपल्याला पडताळून पाहणे गरजेचे आहे.

आता ही देशभक्ती ही केवळ शाहिद होणाऱ्या लोकांना अभिवादन करून वाढणार आहे का ? का आपण फक्त स्वदेशीचा वापर करून बळावणार आहे तर असं मला नक्कीच वाटतं नाही.

देशभक्ती ही फक्त सांडणारं रक्त आणि ऑलम्पिक मधल्या वाढणाऱ्या मेडल नी वाढत नसते .
आपण देशासाठी वाचवलेलं पेट्रोल, एखादं लावलेलं आणि वाढवलेल झाडं , सार्वजनिक मालमत्तेची जपणूक , वाचवलेलं एक ग्लास पाणी यातून सुध्दा ती तितकीच सार्थ बनू शकते .

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असताना किंवा गुलामगिरीतला देश मेहनतीने व प्रतिकाराने आपली प्रगती करणे हे कदाचित न्यूटन च्या नियमात बसेल,
 पण जेव्हा आपला स्वयंपूर्ण होणारा व आर्थिक स्तर उंचावणारा समाज जेव्हा orbit shifting करून झेपावत असेल तर नियम वेगळ्या दृष्टीने पहाणे तितकेच महत्वाचे ठरेल असे मला सांगावे वाटते.

त्यामुळे या १५ ऑगस्टला ए मेरे वतन के लोगो ऐकून शाहिद लोकांचे स्मरण जरूर करू या पण आपल्या प्रत्येकाने देहभक्ती कडून थोडे तरी वेगळ्या पद्धतीने देशभक्त बनायला सुरवात करू या ...

जय हिंद

भारतीय स्वातंत्र्यादिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
१५ ऑगस्ट २०१८

Saturday, June 9, 2018

अपेक्षा



वेळेवर येण्याची
 वेळेवर जाण्याची
 पापणी लवण्याची
 डोळे मिटण्याची
अपेक्षाच ती

धडधडत्या हृदयाची
धडपडत्या श्रमाची
हातातल्या फुलाची
वाट पाहत्या मुलाची
अपेक्षाच ती

अडीच अक्षराची
न पाहिलेल्या ईश्वराची
सभेतल्या टाळ्यांची
स्थितप्रज्ञ डोळ्यांची
अपेक्षाच ती

भाकरीच्या तुकड्याची
शाळेच्या बाकड्याची
खाटकाच्या च्या बोकडाची
सरणावरच्या लाकडाची
अपेक्षाच ती

  पूर्ण होण्याची
 पूर्ण करण्याची
आश्वस्त होण्याची
 आश्वासन देण्याची
अपेक्षाच ती....

जयदीप भोगले
9 जून 2018

Wednesday, March 7, 2018

माध्यमे आणी बोली भाषांचे वाढते महत्त्व


पूर्वी साहित्य म्हटले की प्रमाण भाषा, शुद्ध भाषा किंवा पुणेरी भाषा असेच गृहीत धरले जायचे
मग त्या साहित्यात फक्त कविता ,कथा कादंबरी नाही तर टेलिव्हिजन युगात कार्यक्रम आणी
सिरिअल सुद्धा बनवल्या जायच्या.
ज्याप्रमाणे पुस्तकांमध्ये नवसाहित्य, मुक्तछंदात्मक कविता ,सामाजिक लेखन, दलित साहित्य
अशी हाताळणी विविध लेखकांनी केली ती तितक्या सहजपणे टीव्ही नवीन आल्यावर सहज
येऊ शकली नाही.
टीव्ही हे कदाचित नवीन माध्यम असल्यामुळे त्यात येणारे कलाकार त्यांना अप्रोच होणारे
निर्माते कलाकार हे सगळे पुण्या मुंबईचे असायचे . टीव्हीवर दूरदर्शन ही एकच वाहिनी
असल्यामुळे साहजिकच त्याचा सर्वप्रथम प्रसार व उपलब्धता ही याच शहरांमध्ये झाली
व या लोकांपर्यंत पोहीचतील असेच कार्यक्रम निर्मात्यांनी बनवले .
हे कार्यक्रम गुणवत्तेनुसार नक्कीच उत्तम होते यात काही शंका नाही पण सर्वसामान्य जनतेच्या
बाजू मांडणारे त्यांच्या घरचे वाटणारे कार्यक्रम कमीच किंवा विरळ असायचे.
आता मी लहानपणी “चाळचाळ नावाची वाचाळ वस्ती “हा कार्यक्रम आवडीने बघयचो पण
आमच्या गावातले जीवन व या शहरी जीवनात खूप फरक असायचा . मला त्यावेळी नक्कीच
चॉईस नसल्यामुळे मी सर्व पाहत होतो पण त्याकाळात बाकी बोली भाषेत नवीन कार्यक्रम
लोकप्रिय होऊ शकतील असे बऱ्याच जणांना कदाचित वाटलेच नाही
मराठी सिनेमा मध्ये सुद्धा ग्रामीण म्हणजे फक्त कोल्हापूर पुरते मर्यादित होते पण महाराष्ट्रात
28 जिल्हे आणि किमान 6 ते 7 अगदी भिन्न म्हणता येतील अशा बोलीभाषा असून सुद्धा
त्याबद्दल त्याचा विचार कधी झाला नाही
पण गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये प्रसार माध्यमे व चित्रपट यामध्ये बोली भाषा व त्यांचे सौन्दर्य
त्यातील खास विनोद ,त्या भागातील व्यक्तिविशेष या सर्व गोष्टींचा जास्त सखोल विचार होऊ
लागला आहे
नोकरी व शिक्षणानिमित्त लोकांचे होणारे स्थलांतरण , टीव्ही ची सहज उपलब्धता, जुन्या
साहित्यामधील नावीन्य चा अभाव व कालाबाह्यता , आणी इतर महाराष्ट्रातून येणारे कलाकार
व त्यांना जनतेने दिलेली पसंती या सर्व पूरक कारणामुळे अशा पद्धतीने नवीन प्रयोग यशस्वी
होऊ शकतात याचा निर्माते व चॅनेल चे कार्यकारी निर्माते व चित्रपट निर्माते यांना वाटते आहे
हा बदल महाराष्ट्रापुरता नसून संपूर्ण भारतभर याचा प्रभाव होतो आहे असं मला गेल्या दहा
वर्षांपासून नक्कीच जाणवत आहे

मी 2005 ला पाहिलेला खोसला का घोसला ने दिल्ली मधल्या खास भाषा शैलीला सुरेखपणे
हाताळले होते. मी दिल्लीत शिक्षणानिमित्त असल्यामुळे अशी भाषा मी जवळून अनुभवलेली
त्यामुळे त्याचे खास कौतुक व authenticity नक्कीच मला जाणवली .
मग ओंकारा, बंटी आणि बबली , बँड बाजा ते अगदी अलीकडच्या दंगल पर्यंत प्रत्येक भाषा
आणि तिथल्या व्यक्ती आणी वल्ली आपण पाहत आहोत पसंत करत आहोत.
धाकड म्हणजे काय हे शब्दशः समजले नाही तरीही सिनेमामध्ये असलेल्या वातावरणात
आपल्याला उमजून जाते आणि याला प्रमाण भाषेतला पर्यायी शब्द कोणता हे आपण विचारत
नाही
हाच धागा ना आना इस देस लाडो , अफसर बीटीया, बालिका वधू ते थेट तारक मेहता या हिंदी
मालिकांमध्ये सुदधा हाताळलेला आपल्याला दिसला असेल
मराठी मालिका हा माझा स्वतः चा जिव्हाळ्याचा विषय ...यात सुद्धा असे कित्येक प्रयोग
यशस्वी पद्धत्तीने झी मराठी ने सुद्धा केलेले आहेत
अवंतिका पासून ते रात्रीस खेळ चाले व तुझ्यात जीव रंगला पर्यंत तिने केलेला प्रवास हा
बोलीभाषेने माध्यमात केलेला प्रवास दाखवतो
सैराट हा इतका ग्रामीण भाषेचा सिनेमा असून सुद्धा 100 करोड चा टप्पा गाठू शकतो याचे श्रेय
निर्माते यांनां तर द्यावेच लागेल पण बोली भाषा प्रमाण भाषेतकीच लोकांना आवडते याचा एक
हा मैलाचा दगडच आहे की काय असे म्हणावे लागेल.
अमेरिकन संस्कृती आणि ब्रिटिश संस्कृती मध्ये सुद्धा स्कॉटिश व कृष्णवर्णीय बोलीभाषा
तितक्याच सशाक्तपणे प्रमाण भाषेबरोबर जाऊन बसलेल्या आपल्याला दिसतात
म्हणूनच की काय आजकाल तरुण पिढीला want पेक्षा waana जास्त जवळचे वाटते हे बोली
भाषेचे जिव्हाळ्याचे नातेच म्हणावे लागेल
पण मराठी मध्ये खूप मस्त आणि उत्कृष्ट हे शब्द लै भारी ने कधी रिप्लेस होतील का हे मात्र
कदाचित येणारी वर्षे ठरवू शकतील.
मकरंद अनासपुरे , भारत गणेश पुरे, संकर्षण कराडे, भाऊ कदम ही सर्व वेगवेगळ्या बोली
भाषा बोलणारी पण तितकीच लोकप्रिय मंडळी बोली भाषांचा झेंडा फडकवत ठेवताना
दिसतात. यांच्या अभिनयाबरोबर आपण बोली भाषेचे सुद्धा कौतूक करायला हवे.
धातू ज्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात कार्बन घातल्यास पोलाद ते अगदी बीड बनतो पण दोघे
तितकेच उपयोगी व सुंदर असतात .अगदी तसेच शुद्ध अशुद्ध भेद न ठेवता प्रत्येक भाषा हा
वेगळ्या धातूच्या रुपाप्रमाणे मानला तर नक्कीच त्याचे सौंदर्य जास्त उत्तम पद्धतिने कळू
शकेल.

लेखनामध्ये काही मर्यादा येण्यामुळे बऱ्याचदा वर्तमानपत्रे अजूनसुद्धा बोली भाषेचा वापर
लेखामध्ये करत नाहीत पण व्हिडीओ माध्यमे ही जास्त प्रभावी असल्यामुळे ती ही जबाबदारी
उत्तम पद्धतीने पार पाडत आहेत
येत्या काळात आपण एखादी सामाजिक चर्चा न्यूज वाहिनीवर सुद्धा मराठवाडी भाषेत पाहू
शकलो तर मला त्यात काही गैर वाटणार नाही
भाषा ही माणसाच्या मनातले लोकांना समजण्यासाठीच असते आणि ती वेगळ्या बोली
भाषांतील शब्दसिद्धीमुळे जास्त समृद्ध होऊ शकते
ज्याप्रमाणे दोन राग मिश्र राग बनवू शकतात तसेच दोन बोली भाषा या नक्कीच नविन मिश्र
भाषा तयार करू शकतात मग त्याला आपण जसे अनवट रागानां स्थान देतो तसे त्या भाषेला
सुद्धा दिले तर काय हरकत आहे
अगदी पनीर टिक्का पिझ्झा असं काहीतरी बनू शकते आणि तो किती छान लागतो हे मी
तुम्हाला नक्कीच सांगायला नको
-- 
जयदीप भोगलेटीप हा लेख  मराठी कल्चरस अँड फेस्टिव्हल या इ दिवाळी अंकात छापून आला होता

Friday, February 2, 2018

कॉफी


धुंद तुझा गंध सखे
स्वच्छदं अशी साथ
श्याम रंग तुझा रात्र जागे
दौडे अशी तू मनात
शहाणी असे तू उष:काली
वेडी होई  जेव्हा रात
गप्पा असो की आठवण
प्रत्येक प्यालातून हाक
पहाडवरची ललना जणू
वाफेतून लागे घुमू
निर असो क्षीर कधी
तुझाच सम्राज्ञी चा थाट
ब्राझील ची लेडी म्हणू
का कुर्ग ची परी तू अस्मानी
काळी जादू करे जगात
जरी दुनिया गोऱ्यांची दिवाणी
कौतुकाचे शब्द माझे
कॉफी असे नाव तुझे
जुनी मैत्री असो की प्रीत नवी
सर्वांनाच तू हवी हवी

जयदीप भोगले
5 जानेवारी 2018
मुंबई एअरपोर्ट

Tuesday, October 17, 2017

दिवाळीचा फराळ




लाडू सखे तुजसम गोड नि माझ्या इतका कडक आहे

चकली आहे खमंग तुजसम नि माझ्याजोगी  चिवट आहे

शुभ्र झाली करंजी तुजसम तरीही बाखर थोडे खवट आहे

चिरोटा अगदी हलका तुजसम पण मजसम  पसरट आहे

बायको म्हणाली हे कौतुक समजू माझे ?? का  फराळावरची टीका आहे

इतका तपशील पुरे झाला पुणेरी तुझ्यापुढे फिका आहे

तुझी कमेंट तर एक्दम जणू माझ्या ऑफिसचाच  फॉरमॅट आहे

काम कितीही भारी करा  तरी दिवाळी बोनस  भुईसपाट आहे

जयदीप भोगले
16 ऑक्टोबर 2017
😊☺☺☺😊

Monday, October 2, 2017

लिमिटेड समाजवादी



समाजकार्य सुद्धा आजकाल समजून करावं म्हणतोय

थोडंस calcluation करूनथोडं उदार व्हावं म्हणतोय

सगळंच केलं लोकांच्या हवाली तर
मला हवालदिल व्हावं लागू नये

म्हणूनच थोडी फी जास्त आकारावी म्हणतोय
थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय

मला पिझ्झा मिळाला तर थोडासा पाव नक्कीच देता येईल
आडातच नाही उरलं तर पोहऱ्यात कोठून येईल

गांधीवादी म्हणून शर्ट काढला जरी नाही
लोकांच्या अश्रू पुसण्याला रुमाल द्यावा म्हणतोय

थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय.



भांडवलवादी जगात असे समाजवादी सुद्धा उरले नाही
फ्लॅट घेऊन लॉक लावून ठेवतील पण
कमी भाड्याने लोकांना देणार नाही

लिमिटेड का होईना जरा माणुसकी जपावी म्हणतोय
थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय

जयदीप भोगले
2 ऑक्टोबर 2017

Monday, September 25, 2017

गणेशवंदन

गणांचा तू नायक 
जगाचा तू पालक
मूषकी विराजी 
वरदविनायक
बुद्धी चा तू देवता
कलेचा तू चाहता
सिंदूर् लेपसी
गिरीजात्मज





कृपेचा तू सागर
ज्ञानाचे तू आगर
भक्तांची चिंता हरसी
चिंतामणी गजानन

दहा दिवस येसी
पृथ्वीवासी होशी
भक्तास तू पावसी
होऊन गणेश

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून

झेंड्यांची पेड दिवाळी करून

देशभक्तीची गाणी  डॉल्बीवरून

येत सगळ्यांचे मन एकच दिवस उचंबळून

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??

अच्छे दिन येतील म्हणून

मल्या च्या पलायन वर कानाडोळा करून

नव्या निवडणुकीला पुन्हा सामोरे जाऊन

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??

गुन्हेगारी  साठी धृतराष्ट्र बनून

आरक्षणांचा अश्र्वमेध खुला सोडून

एका नवीन गुलामगिरी चा रस्ता शोधून


काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??



जयदीप भोगले
१५ ऑगस्ट २०१७




















शेअरचा शिरा





शेअरची कढई आणि लाभाचा रवा

भाजायचा कसा तो कळायला हवा


स्टॉप लॉस चा वास दुरूनच घ्यावा
आणि पोजिशन चा पाक थोडा एकतारी करावा

रवा आणि मैदा जसा एकत्र करायचा नसतो




पन्नास शेअरचा पोर्टफोलिओ एकत्र बनवायचा नसतो

शेअरच्या शिऱ्याची रेसिपी नुसती वाचून जमत नसते

लाभाची चव स्वतः परतल्याशिवाय मिळत नसते







जयदीप भोगले
१२ ऑगस्ट २०१७


Monday, July 24, 2017

स्वप्नाली


स्वप्नाली


 बेधुंद अशा सांजवेळी  ..तुझे पत्र उशाखाली

 शब्द तुझा स्पर्श जणू.. भास असे तो मखमाली

 स्वप्न असे का सत्य न कळे ..श्वास उरी वरखाली

 वाऱ्याची झुळूक सांगे मज ..का बनशी तू स्वप्नाली?

 सुगंध असे कस्तुरीसम ..पाश तुझा भवताली

 चांदणे ही मज दाह देई ..भेट तुझी ती रानजाई

 देह माझा एकटाच तो झुरे... सख्या तुझ्यापाई


सख्या तुझ्यापाई


 जयदीप भोगले
24 जुलै 2017
 खंडाळा

Sunday, July 23, 2017

थ्री बीएचके



मनातलं एकदम खर झालं तर
 एक थ्री बीएचके घेऊन टाकू आता लवकर

 प्रशस्त बेडरूम मुलाची स्टडी रूम
 किचन सुद्धा एकदम असेल ते सुपर
 एक थ्री बीएचके घेऊन टाकू आता लवकर


 बेड कसा इटालियन असेल जणू खास
 मार्बल ची फ्लोरिंग बनवू ती झकास
 पोरांसाठी सुद्धा आणू इम्पोर्टेड बंकर
एक थ्री बीएचके घेऊन टाकू आता लवकर

 मग माझ मुल मला हळूच म्हणाले
 वेळेवर घरी येऊन बाबा किती दिवस झाले?

 मी आणि ममा वाट पाहून झोपतो
उशिरा येऊन तुमचा मुक्काम हॉल मध्ये असतो

 बंकर पेक्षा मला आवडते आईच्याच कुशीत
 आजीची गोष्ट मस्त आणि आमच ते गुपित

 हवा तुमचा वेळ आणि हवे तुमचे हसू
 उशीची फेकाफेकी कधीतरी करत आपण बसू


 आई बाबा आणि मी हाच माझा बंगला
भकास तो थ्रीबीचके बाबा नाही चांगला

 जयदीप भोगले
 २० जुलै २०१७

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...